पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी (ता. 11 जानेवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना केले. या विधानामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. याबाबत मविआच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राऊतांच्या विधानावर भाष्य केले आहे. (Supriya Sule criticism of Sanjay Raut statement saying that municipality is rightful election of workers)
खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आधी एकत्र असतानाही वेगवेगळीच लढत होतो. मागच्या वेळी सुद्धा आम्ही वेगळेवेगळे लढलो होतो, त्याच्यामध्ये नवीन काय आहे? तसेच, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे. सगळीच जर इलेक्शन्स आपल्या सोयीने लढायला लागलो तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्यांना कधी नाय मिळणार? हे त्यांचंही इलेक्शन आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे यावेळी खासदार सुळे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, संजय राऊत हे मोठे नेते असल्याने त्यांनी केलेले विधान हे त्यांच्या पक्षाची भूमिका असेल. तरी पण सुद्धा आम्ही एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढू. पण जर ते सोबत नाही आले तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे. शरद पवार आणि आम्ही काँग्रेस आमची अनेक वर्षांची नैसर्गिक आघडी राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही दोघे आताही एकत्रित राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ज्यामुळे आता खरंच महाविकास आघाडीत फूट पडली असून ठाकरे गट याची अधिकृत घोषणा सुद्धा करणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.