हजार पार गेलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या किंमतीनुसार १४ किलोचा सिलिंडर आता १०५३ रुपयांवर पोहोचला आहे. पाच किलोच्या सिलिंडरमध्ये १८ रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळीच तेल कंपन्यांनी हे नवे दर जाहीर केले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी गॅस दरवाढीनंतर एक ट्विट केले आहेत.
ट्विटमध्ये नेमके काय –
स्वयंपाकाचा गॅस पुन्हा एकदा वाढला असून यावेळी ही दरवाढ ५० रुपयांची आहे. म्हणजे आता मुंबईत हे सिलिंडर घेण्यासाठी १ हजार ५२ रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागणार आहेत. सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रासलेली असताना त्यांना काहीतरी दिलासा मिळणे अपेक्षित होते, परंतु उलट गॅस दरवाढ झाल्यामुळे त्यांच्या त्रासात वाढ झाली.अनेक कुटुंबे पुन्हा चुलीकडे वळली आहेत.केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री मा. हरदीप सिंग पुरी आपणास नम्र विनंती आहे की, कृपया जनतेवर पडणारा आर्थिक बोजा लक्षात घेता ही दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे ट्विट त्यांनी केले आहे.
परंतु उलट गॅस दरवाढ झाल्यामुळे त्यांच्या त्रासात वाढ झाली.अनेक कुटुंबे पुन्हा चुलीकडे वळली आहेत.केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री मा. हरदीप सिंग पुरी आपणास नम्र विनंती आहे की, कृपया जनतेवर पडणारा आर्थिक बोजा लक्षात घेता ही दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
— Supriya Sule (@supriya_sule) July 6, 2022
राष्ट्रवादीची टीका –
एकीकडे महाविकास आघाडीतील ५० आमदार फोडले आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताच भाजपसरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढावा? असा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जनतेच्या कोर्टात भिरकावला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे सरकार आले आहे. आम्ही पेट्रोल – डिझेलवरील कर कमी करु असा दिलासा देण्याचे वक्तव्य केलेले असतानाच दुसरीकडे भाजपने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त होत असल्याचे महेश तपासे म्हणाले.