राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर येत्या सोमवारी म्हणजे १२ एप्रिलला शस्त्रक्रिया होणार आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया होईल. शरद पवार यांना पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास झाल्यानेच याआधी त्यांनी ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया शरद पवार यांच्यावर होणार आहे. शरद पवार यांना या शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये येत्या ११ एप्रिलला दाखल करण्यात येणार आहे. शरद पवार यांना पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास झाल्याने त्यांच्या ३० मार्चला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती स्थिरावल्यानंतर शरद पवार यांना ३ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.
शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सात दिवसानंतरच त्यांच्या पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती. तसेच पंधरवड्याच्या आतच त्यांच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येईल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसारच आता येत्या १२ एप्रिल रोजी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पित्ताशय काढण्यासाठीची ही शस्त्रक्रिया असेल. त्यासाठी ब्रीच कॅंडीच्या डॉक्टरांची टीम या शस्त्रक्रियेच्या तयारीला लागली आहे. शरद पवार यांच्या पोटातील पित्ताशयाचे खडे काढण्याची शस्त्रक्रिया ही डॉ मायदेव यांच्या नेतृत्वातील टीमने केली होती. आता पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठीही येत्या दिवसांमध्ये हीच डॉक्टरांची टीम सर्जरी करणार असल्याचे कळते. सर्वच गोष्टी योग्यरीत्या जुळल्या की शरद पवार यांच्यावर शस्रक्रिया करण्यात येईल असे पवारांकडून सांगण्यात आले होते.
शरद पवार यांनी रूग्णालयातून घरी आल्यानंतर covid-19 चा डोस घेतला होता. त्यासाठी जेजे रूग्णालयातील टीम शरद पवार यांच्या घरी पोहचली होती. त्यानंतर कोरोनाच्या परिस्थितीवर नेमके भाष्य करणारे आवाहन शरद पवार यांच्याकडून एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले होते. कोरोना नियंत्रणासाठी ज्या काही उपाययोजना यासंबंधीच्या सूचना आलेल्या आहेत. त्या नजरेसमोर ठेवून आपल्याला निर्णय घ्यावे लागत आहेत. हे निर्णय राबवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मनापासून मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याकरिता आपल्या सगळ्यांना व प्रसारमाध्यमांना, राजकीय नेत्यांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या घटकांना विनंती आहे की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, विचार करुन या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यसरकारचे जे प्रयत्न आहेत. त्या प्रयत्नांना आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळाले पाहिजे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस व सगळे घटक अशा संकटाच्या काळात बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पूर्ण एकजुटीने सामोरं जाण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करेल, असेही शरद पवार म्हणाले होते.