घरताज्या घडामोडी... म्हणून आपला हा निर्णय न पटणारा, सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक...

… म्हणून आपला हा निर्णय न पटणारा, सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पवारांनी अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप झाला. तसेच हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याच्या प्रतिक्रिया देखील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, शरद पवारांनी अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पवारांनी भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी पवारांची महाराष्ट्राला गरज असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे पत्रात?

“आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब

- Advertisement -

अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

सर नमस्ते. खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्य ही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणुनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही.

- Advertisement -

सर, बदल हा सृष्टीचा नियम असतो. जे काल होते ते आज असेलच असे नाही, जे आज आहे ते उद्या राहीलच असे नाही. पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो. महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे.

कदाचित आपल्यानंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतीलही पण सर, माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केलीत. कुणी काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले.

सर, एकीकडे ना धो महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला.

सर, कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतुसूत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते. एक नेतृत्व, दोन वक्तृत्व, तीन विचारधारा, चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारता येणार नाही.

शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही.

पण आपला अनुभव, प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम, या सगळ्यांची आज गरज आहे. एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे, त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे.

प्रा. सुषमा अंधारे”


हेही वाचा : गौतम गंभीरनंतर कोहलीचा ‘या’ खेळाडूसोबत राडा, मॅक्सवेलनं केली मध्यस्थी अन्.. व्हिडीओ व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -