शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने 3 नोव्हेंबरला संबंधीत जागेवर निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. यावरून आता भाजप आणि शिवसेनेत सामना रंगताना दिसतोय. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिलीये. यात भाजपचे आमदार आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या निवडणुकीवरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ज्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
2019 मध्ये 40 ठिकाणी शिवसेनेचा विरोधात युती धर्म न पाळता बंडखोर उमेदवार उभे केले. बार्शीमध्ये जाणीवपूर्वक सेना उमेदवारा समोर अपक्ष उमेदवार उभे केले तर उरणमध्ये सेनेचे उमेदवार भोईर यांचा विरोधात अपक्ष उमेदवार उभा केला. ह्याच पद्धतीने अंधेरीमध्ये रमेश लटके यांच्या विरोधात मुरजी पटेल ह्यांना उभे केले तेव्हा भाजपने कांगावा केला की, मुरजी पटेल आमचा काही संबंध नाही भाजपचा हा कांगवा उघडा पडला आहे. भाजपने आता अधिकृत उमेदवार दिला आहे. यावरून त्यांचा बुरखा घेतलेला उघडा पडलेला आहे. अशा शब्दात अंधारेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपने कधीही संवेदनशील नितीपूर्ण आणि युती पाळत राजकारण केले नाही. यावर सातत्याने उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. मात्र आम्हीच कसे सच्चे असा कांगावा शेलार, दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केला. भाजप कायम युती धर्म न पाळता शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसवत शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील होते. असा आरोपही अंधारे यांनी केला आहे.
सत्य जास्त काळ लपत नाही. शिवसेना कोणाची असा प्रश्न वारंवार विचारला जातो तेव्हा आम्ही ठामपणे सांगतो जिथे सच्चा शिवसैनिक जिथे बाळासाहेबांचा विचार आणि जिथे उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व तीच खरी शिवसेना. परंतु शिवसेना आमचीच खरी असे ऊर बडवून घेत आहेत त्या सगळ्यांनी आशिष शेलार यांचे ट्विट बघावे. आशिष शेलार शिंदे गट असा उल्लेख करत आहेत. हा उल्लेख शिंदे साहेब यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या मिंध्याना आरसा आहे. अशा शब्दात त्यांनी शेलारांवर निशाणा साधला आहे.