इंडिया टुडेचे वृत्तनिवेदक राहुल कंवल यांनी खोटा दावा करत शिवसेनेची बदनामी केली असून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारं पत्र शिवसेनेने ‘इंडिया टुडे ग्रुप’ला लिहिलं आहे. ‘सेनेचे गुंड’ सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचा वक्तव्य राहुल कंवल यांनी शोमध्ये केलं होतं. परंतु हा दावा खोटा आणि शिवसेनेची बदनामी करणारा आहे. याबाबत इंडिया टूडेने त्यांच्यावर कारवाई करावी तसंच राहुल कंवल यांनी माफी मागावी, असं शिवसेनेने पत्रात म्हटलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हे पत्र ‘इंडिया टुडे ग्रुप’चे संस्थापक अरुण पुरी यांना लिहिलं आहे.
लंडनच्या ‘द टाइम’ वृत्तपत्राला मुलाखत देत सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी खळबळजनक दावा केला होता. लस वाटपावरुन आपल्याला देशातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींकडून धोका आहे.” “सत्य बोलल्यास आपला शिरच्छेद केला जाईल,” अशी भीतीही पुनावाला यांनी व्यक्त केली होती. यानंतर वृत्तनिवेदक राहुल कंवल यांनी खळबळजनक शिवसेनेवर केला होते. “अदर पुनावाला यांनी मला व्हिडीओ पाठवले आहेत, ज्यात शिवसेनेचे गुंडे त्यांच्या फॅक्टरीबाहेर उभे राहून धमकी देत होते आणि लसीची मागणी करत होते.” राहुल कंवल यांच्या दाव्यानंतर शिवसेनेने ‘इंडिया टुडे’चे संस्थापक अरुण पुरी यांना पत्र लिहून संबंधित अँकरवर कारवाई करण्याची मागणी केली.
“तुमच्या वृत्तवाहिनीतील ज्येष्ठ निवेदकाने केलेल्या बनावट बातम्यांविषयी मी तुम्हाला लिहित आहे. राहुल कंवल यांनी आजच्या शोमध्ये लसीसाठी ‘सेनेचे गुंड’ अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचा दावा केला होता. ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि बदनामीकारक आहे. दुसर्या पक्षाच्या अध्यक्षाचा व्हिडीओ शिवसेनेशी जोडून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे आमची बदनामी करणं यावरुन अँकरचा राजकीय पक्षपातीपणा स्पष्ट दिसतो. निवडणुकीच्या निकालाचा महत्त्वाचा दिवस आणि कोविड-१९ महामारीबाबत देशभरात सुरु असलेल्या चर्चेपासून लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक बदनामीकारक आणि खोटी माहिती पसरवण्याची मोहीम सुरु आहे,” असं सुभाष देसाई यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.