दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लावावा यासाठी शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी तपासणीसाठी पाठवता यावेत यासाठी शिक्षण विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. मात्र शाळेतून उत्तरपत्रिक घरी घेऊन जाताना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकणी पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठेपर्यंत शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीची सक्ती करु नये, अशी मागणी टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट या शिक्षक संघटनेने केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानुसार १० जूनपर्यंत निकाल लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे वेळेत निकाल लावता यावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. लॉकडाऊन असल्याने शाळांमधील उत्तरपत्रिका शिक्षकांना तपासणे शक्य नसल्याने निकाल विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेपर घरी तपासण्यासाठी नेता यावेत यासाठी शिक्षण विभागांकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी न मिळाल्याने व शाळा प्रशांसनाकडून शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी शाळेत येण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे.
त्यामुळे अनेक शिक्षक घरातून बाहेर पडून उत्तरपत्रिका आणण्यासाठी शाळेत जात आहेत. मात्र त्यांच्याकडे अत्यावश्यक सेवेचा पास, तसेच पोलिसांना त्यासंदर्भात कोणतेही आदेश नसल्याने पोलिसांकडून शिक्षकांना अडवण्यात येत आहे. काही ठिकणी पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या घटनाही घडत आहेत. परिणामी शिक्षकांना शाळेतून उत्तरपत्रिका घरी आणण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहले. त्यानंतर सचिवांना सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून शिक्षकांना लॉकडाउन मधून मुभा द्यावी, अशी मागणी केली.
मात्र प्रत्यक्षात मात्र शिक्षकांना पास काढणे, पोलीसांना विनंत्या करुन शाळेत पोहचणे, प्रवास आदी अडचणी येत असल्याचे शिक्षक सांगत आहेत. अनेक शिक्षक गावी पोहचले आहेत. तसेच काही परराज्यातील शिक्षकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे. अशा वातावरणात पेपर तपासायचे कसे असा सवालही टीडीएफकडून करण्यात येत आहे.