पंढरपूर : यंदाच्या वर्षीची विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा नेमके कोण करणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री अजित पवार. परंतु, आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतलेल्या बैठकीत याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून अनेक ठिकाणी नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या पूजेला कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या भावना शासनाला कळविण्यात येणार असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीत उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. (temple committee took a big decision regarding the official worship of Vitthal Rakhumai)
हेही वाचा – ‘सिद्धिविनायक’ अध्यक्षपद सोडल्यानंतर आदेश बांदेकरांची भावनिक पोस्ट; म्हणाले, तो दिवस कधीही…
मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली असली तरी इतर मराठा संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. बऱ्याच कार्यक्रमांना नेतेमंडळींना विरोध करण्यात आला आहे. ज्यामुळे मराठा आंदोलकांची भूमिका लक्षात घेत कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पंढरपुरात मराठा आंदोलकांकडून तीव्र भूमिका घेतली होती. सकल मराठा समाजाकडून उपमुख्यमंत्र्यांना इशारा देण्यात आला होता. त्यामुळे याचा कार्तिकी एकादशीवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता मंदिर समितीने कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना पूजेला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे. परंतु, या पूजेचा मान कोणाला मिळणार या विषयी अद्याप काही सांगण्यात आलेले नाही. मागील वर्षी कार्तिकी एकादशीला राज्यात केवळ एकच उपमुख्यमंत्री होते, ज्यामुळे त्याचा मान हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता. परंतु, आता दोन उपमुख्यमंत्री असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, मराठा समाजातील आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मंदिर समितीकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे. तर, ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली तर त्यांना काळे फासण्यात येईल असा इशाराही सकल मराठा समाजाने दिला होता, ज्यामुळे आता कोणत्याही उपमुख्यमंत्र्याचे हस्ते ही पूजा करण्यात येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.