राज्य सरकारमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बदल्या करण्यात येतात. पण नव्याने आलेल्या शासन निर्णयानुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या अपवादात्मक परिस्थितीमुळे आणि विशेष कारणामुळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात ३० जून २०२१ पर्यंत कोणत्याही बदल्या (सर्वसाधारण बदल्या तसेच काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे करावयाच्या बदल्या) करण्यात येऊ नयेत असे शासन निर्णयाद्वारे सूचित करण्यात आले आहे.
काही ठराविक कारणास्तव बदल्या अनुज्ञेय राहतील असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणे, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सेवेतील रिक्त पदे भरणे, शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्याने बदली करण्याचा अधिकार हा सक्षण प्राधिकाऱ्याला देण्यात आला आहे. कोरोनाच्या परिस्थितीनुसार पुढील कारवाई करण्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.