मुंबईः शिवसेनेचे आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा स्वीकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडालीय. शिंदेंच्या बंडाळीमुळे ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात असून, महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंनीही आपल्या ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय.
या सर्व राजकीय नाट्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारही कोसळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विटर हँडलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवून युवासेना प्रमुख असं ठेवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठक घेणार आहेत, त्यापूर्वी पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्यामुळे ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे सोमवारी रात्री मुंबईतून निघून गुजरातच्या सुरतमध्ये 35 आमदारांसह एकनाथ शिंदे दाखल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने आसामला नेण्यात आले. बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर उतरताच दोन वेगवेगळ्या बसमधून शिंदे यांच्यासह आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यात आले. एकनाथ शिंदेंना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवल्यानंतर अजय चौधरींची त्या जागी वर्णी लावण्यात आली आहे. परंतु शिंदे समर्थक 35 आमदारांनी अजूनही एकनाथ शिंदेच आमचे विधिमंडळ गटनेते असल्याचं सांगितलं आहे. तसं पत्रच एकनाथ शिंदे विधिमंडळ सचिव आणि अध्यक्षांना देणार आहेत.
हेही वाचाः महाराष्ट्रातल्या राजकीय संकटावर भाजपची बारीक नजर, ‘या’ पर्यायांचा विचार