राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी त्यांच्यात चर्चा झाली. यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यावरुनच राज ठाकरे यांच्याशी अराजकीय गप्पा झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसचं आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू त्यामुळे भेट झाल्याचं ते म्हणाले. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी, राज ठाकरे उत्तम होस्ट आहेत, लोकांचं स्वागत चांगलं करतात. हवं तर फडणवीस यांनी त्यांच्या घरी 8 दिवस राहायला जावं. देवेंद्र फडणवीस यांचीच काय अन्य कोणीही कुठेही कोणाचेही भेट घेतली. तरीदेखील आम्हाला म्हणजे शिवसेनेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. ( Thackeray group leader Sanjay Raut criticizes Raj Thackeray Devendra Fadnavis meeting )
राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना शिवतीर्थावर जायची इच्छा झाली असेल तर त्यांनी तिथे जावं, इतरही लोकांनी जावं. तिथे आठ दिवस राहावं. शिवतीर्थावर सकाळी वॉकला जावं. तिथे उत्तम पदार्थ मिळतात, चांगले हॉटेल्स आहेत तिथे. मुळात कोण कोणाकडे जात आहे. याच्यामुळे शिवसेनेचं भविष्य मार्गी लागत नाही, शिवसेना ही शिवसेनेच्या जागेवर आहे.
काल रात्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास ही भेट होत असल्याने या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. नेमकं असं काय कारण असेल की, यावेळेला या दोन बड्या नेत्यांची भेट होत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
( हेही वाचा: ‘शिंदेंच्या खासदारांना भाजपच्या तिकीटावर लढायचंय’; राष्ट्रवादीचा गौप्यस्फोट )
राज ठाकरे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षबांधणीच्या कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधातही रोखठोक भूमिका मांडत आहेत.