राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सेनेचे तब्बल 40 आमदार आणि 12 खासदार फुटून शिंदे गटात सहभागी झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. या ग्रामपंचायतीत 7 पैकी 7 जागा ठाकरे गाटने जिंकल्या आहेत.
शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर ग्रामपंचायतच्या पहिल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला हे यश मिळाले आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे.
माजी आमदार रविकांत पाटील आणि जिप सदस्य अमर पाटलांच्या गटाकडे सत्ता –
सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून सर्वात प्रथम चिंचपूर ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या गटाने सातपैकी सर्व सात जागा जिंकत भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाला धक्का दिला आहे. माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.
या जिल्ह्यातील ग्रामपंचायींचे लागणार निकाल –
राज्यातील सत्तापेच कायम असतानाच १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता आहे. नाशिक – ३६, धुळे – ४१, जळगाव – २०, अहमदनगर – १३, पुणे – १७ , सोलापूर – २५, सातारा – ७, सांगली – १, औरंगाबाद – १६, बीड – १३, परभणी – २, उस्मानाबाद – ९, जालना – २७, लातूर – ६ आणि बुलडाणा – ५ या ग्रामपांचायींच्या निवडणूकीचे आज निकाल लागणार आहेत.