घरमहाराष्ट्रएकदा त्रास द्यायचा म्हटलं की..., जयंत पाटील ED चौकशीवरून ठाकरे गटाचे टीकास्त्र

एकदा त्रास द्यायचा म्हटलं की…, जयंत पाटील ED चौकशीवरून ठाकरे गटाचे टीकास्त्र

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची मंगळवारी ईडीने (ED) तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. IL & FS या कंपनीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीला अधिक माहिती हवी आहे व त्यासाठी जयंत पाटील यांना पाचारण केले. ही माहिती ते लेखी स्वरूपातही मागवू शकले असते, पण एकदा त्रास द्यायचा म्हटलं की, सभ्यता गुंडाळून ठेवली जाते, असे टीकास्त्र ठाकरे गटाने भाजपावर सोडले आहे.

ज्या प्रकरणात जयंत पाटील यांना बोलावले तो काय प्रकार आहे? पण ‘घोटाळा घोटाळा’ म्हणून भुई बडवली जात आहे. या कथित घोटाळ्याशी संबंधित राजकारणी भाजपा परिवारातही असू शकतील, पण त्यांना चौकशीसाठी अशी बोलावणी केली जात नाहीत. तो मान फक्त भाजपापुढे न झुकणाऱ्या विरोधकांचा, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena UBT) मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

जयंत पाटील यांच्यावर भाजपाकडून दबाव
जयंत पाटील यांनीही भाजपाची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपामध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपाचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

काही पाटलांचे पाणीच वेगळे…
जयंत पाटील दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात गेले व रात्री साधारण दहा वाजता बाहेर पडले. या काळात जयंत पाटील यांनी एक पुस्तक वाचून संपवले. ते हसतमुख होते व त्या रात्री त्यांना सुखाने झोप लागली असेल. निर्भय माणसे शांत झोपतात. चौकशांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शांत झोप लागते, हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले. पाटला-पाटलांत फरक असतो! काही पाटलांचे पाणीच वेगळे असते. जयंतराव त्यापैकीच आहेत, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

- Advertisement -

पक्षांतर करताच भाजपाकडून ‘त्यांना’ ईडीपासून अभय
हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे नेते भाजपामध्ये सामील झाले आहेत व त्यांनी मध्यंतरी जाहीर केले होते की, ‘‘मला आता शांत सुखाने झोप लागते. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सवाल्यांची भीती आता अजिबात नाही. कारण मी दाराला भाजपाचे कडीकोयंडे लावले आहेत!’’ सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनासुद्धा सुखाने झोप लागत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहेच. काँग्रेसमधून भाजपामध्ये आल्याने त्यांच्यावरील ईडी वगैरेंचे बालंट टळले आहे. शिवसेनेचे 40 आमदार ईडी, सीबीआयच्या भयाने उंदरासारखे पळाले. त्यापैकी अनेकांवर चौकशांचे समन्स व अटकेचे वॉरंट होते. पक्षांतर करताच भाजपाने त्यांना ईडीपासून अभय दिले, पण जे भाजपाच्या कुटील कारस्थानाला बळी पडले नाहीत, असे छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांसारखे नेते ईडी कारवाईचे बळी ठरले, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -