सावंतवाडी : देवेंद्र फडणवीस हे पाव उपमुख्यमंत्री झाले आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हुडी घालून करामती केल्या त्या भाजपावरच उलटल्या, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. सावंतवाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केली आहे. भाजपा संपला आणि माझी शिवसेना आणखी फोफावली, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांना मला सांगायचे आहेकी, तुम्ही पाव उपमुख्यमंत्री झालात. पुन्हा येईल, पुन्हा येईल, अशी घोषणा करताना मोठे होतात. घोषणा करताना टरबूज होते आणि आता झालेत चिराट. तरी तुम्हाला काही पटत नाही. तुम्ही फोडाफोडीचे धंदे करत आहात, मी आजारी असताना रात्रीचे तुम्ही हुडी घालून ज्या करामती केल्यात, आता त्या करामती तुमच्या पक्षात उलटल्या आहेत. तुमचा पक्ष संपला आहे. उलट माझी शिवसेना आणखी फोफावली आहे.
हेही वाचा – Aaditya Thackeray : महाराष्ट्रातील गँगवॉरचे मुख्यमंत्री लीडर, आदित्य ठाकरेंचा आरोप
पंतप्रधान मोदींनी कोकणाला काही दिले नाही
पंतप्रधान मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मधल्याकाळात मालवणमध्ये नौदल दिन साजरा झाला. मला बरे वाटले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या जे लक्षात आले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आले. पहिल्यांदाच नौदल कोकणात साजरा झाला. यावेळी शक्ती प्रदर्शन देखील झाले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच कोकणात आले होते. मला वाटले होते की, पंतप्रधान कोकणाला भरघोस काही तरी देऊन जातील, कारण ते निसर्ग चक्रीवादळात आले नाही. पंतप्रधानांनी चक्रीवादळ, अवकाळीचा पैसा देखील दिला नाही. महाराष्ट्र आता ताकदीवर उभा राहोतच आणि हा स्वत:च्या ताकदीवर देश सुद्धा उभा करतो. ही महाराष्ट्राची ख्यातील आहे. पण मला वाटले होते की, पंतप्रधान कोकणाला काही तरी भरघोस देऊन जातील, दिले तर काहीच नाही. पण जाताना पाणबुडी प्रकल्प सुद्धा घेऊन गेलेत. मला आता भीती वाटू लागले की, पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. येथून काही तरी गुजरातला घेऊन जातात की काय? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली