नवी मुंबई : राज्यात झालेल्या सत्तांतरा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या आरोप प्रत्यारोप आणि कुरघोडयांचे सत्र सुरु झाले आहे.ठाणे आणि नवी मुंबईतही ठाकरे समर्थकांना पोलिसांच्या बळाचा वापर करुन खोटे गुन्हे दाखल करुन वेठीस धरण्याचा प्रकार सुरु झाला आहे. या पोलिसांकडून एक प्रकारे ही दडपशाही सुरु असल्याचा आरोप करीत नवी मुंबईतील ठाकरे समर्थकांनी पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढला. ईडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांची सुपारी घेऊन आणि शिंदे गटाचे मंडलिकत्व पत्करून जर पोलीस मातोश्रीच्या निष्ठावंतांना संपवण्याचा प्रयत्न करीत असतील तर खपवून घेतले जाणार नाही. विनाकारण जर पोलिस शिवसैनिकांना त्रास देत असाल तर आमच्या हातात आता मशाल आणि मनात विस्तव आहे. त्यामुळे आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा नवी मुंबई पोलिसांना देण्यात आला. यावेळी मोर्चकर्यांनी ईडी सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने दणाणून सोडला. (Thackeray supporters warn Navi Mumbai police)
नवी मुंबईतील ज्येष्ठ नगरसेवक एम.के.मढवी यांना तडीपार करण्यात आले आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांच्या पोलिस संरक्षणात अचानक कपात करण्यात आली आहे तर अनेक पदाधिकार्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची सत्ताधार्यांच्या निर्देशानुसार पोलिसांकडून छळवणूक सुरू झाली आहे. या खुनसी कारवाईचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे ठाकरे समर्थकांकडून सांगण्यात आले.बेलापूर येथील सीएनजी पंपाजवळ असलेल्या मैदानातील सभेनंतर एकत्रितपणे मोर्चाने पोलिस आयुक्तालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला जुन्या महापालिका मुख्यालयासमोर पोलिसांनी अडवले. त्यानंतर शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव, शिवसेना सचिव खा.विनायक राऊत, खा.राजन विचारे,आमदार अजय चौधरी, सुनील प्ंरभु, विलास पोतणीस, संजय पोतणीस, सुनील शिंदे, मनिषा कायंदे, शिवसेना उपनेते विनोद घोसळकर, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, सुभाष भोईर, केदार दिघे, बबन पाटील, शिरीष घरत, मनोहर भोईर, चंद्रकांत बोडारे, मधुकर देशमुख, आप्पा पराडकर, भाऊ चौधरी, संजय तरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विजया पोटे, निता परदेशी, सुवर्णा जोशी, ममता पाटील, विनया मढवी, युवासेना सहसचिव करण मढवी आदी सहभगी झाले होते.
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात शंभर गुन्हे दाखल आहेत, अशी कबुली त्यांनी स्वत:च दिली आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी माजी नगरसेवक मढवी यांच्या प्रमाणे तडीपारीची कारवाइर त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्र्यांना तडीपार करण्याची हिंमत करून दाखवावी, अशी टिका नाव न घेता शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली.
राज्यातील पोलिस हे सांग काम्या प्रमाणे वागत आहेत. ठाकरे समर्थकांना एन्काऊन्टरची धमकी आणि तडीपारीची कारवाई करण्याचे सत्र सुरु आहे. येत्या अधिवेशनामध्ये आवाज उठवण्यात येणार आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी दिला.
गद्दारांचे सरकार आल्यापासून निष्ठावंत शिवसैनिकांना त्रास देण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी कायद्यानुसार काम करावे, कुणाचे तरी कार्यकर्ते म्हणून वागू नका. सरकार आज असले तरी उद्या जाणार आहे. त्यावेळी मात्र जितका त्रास दिला आहे, तो व्याजासकट वसुल करू.
-खा.अरविंद सावंत, शिवसेना नेते
शिवसेनेचा जन्म अन्यायाचा विरोध करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे शिवसैनिक त्रासाला घाबरत नाही. माझे पोलीस संरक्षण काढल्यानंतर लगेच मध्यरात्री माझ्या घराबर हल्ला करण्यात आला. हा हल्ला सरकारनेचे घडवून आणला आहे. असे कितीही हल्ले झाले तरी मी झुकणार नाही. प्राण गेले तरी शिवसेना सोडणार नाही.
-आ.भास्कर जाधव, शिवसेना नेते
हेही वाचा – भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा