मुंबई : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेले जात आहेत. त्यामुळे येथील लाखो तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घासदेखील हिरावून घेतला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परकीय गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीचे फुगे कितीही फुगवत असले तरी महाराष्ट्रातील सुमारे नऊ लाख कोटींचे प्रकल्प केंद्राने बाहेर पळवून नेले आणि राज्यातील काही लाख होतकरू तरुणांचा रोजगार हिरावून घेतला, ही वस्तुस्थिती आहे. पुण्यात बेरोजगारांच्या रांगा लागल्या त्या यामुळेच, अशी जोरदार टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray Vs BJP: Uddhav Thackeray’s criticism of the project that went to another state)
काही महिन्यांपूर्वी कॅनडातील भारतीय तरुणांनी नोकरीसाठी रांगा लावल्याचे प्रसिद्ध झाले होते. आता हेच चित्र पुण्यात दिसले. कॅनडातील भारतीयांच्या बेरोजगारीसाठी त्यावेळच्या ट्रुडो सरकारकडे बोट दाखविणारी भक्त मंडळी आता पुण्यातील रांगेबद्दल कोणाकडे बोट दाखविणार आहे? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा – Unemployment : त्या व्हिडीओने केली मोदी-फडणवीस सरकाराच्या दाव्यांची पोलखोल, ठाकरेंचा घणाघात
अमेरिकेतूनही 17 लाख भारतीयांना परत पाठवून येथील बेरोजगारीत मोदीमित्र ट्रम्पदेखील भरच घालणार आहेत. पुण्यातील बेरोजगारांच्या रांगेचा व्हिडीओ मोदी सरकारचा भंपकपणा उघड करणारा आणि त्यांच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. अर्थात, बेरोजगारांना ‘पकोडे’ तळायला सांगणारे आणि देशातील 81 कोटी जनतेला रोजगाराऐवजी मोफत धान्य देत असल्याबद्दल स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेणारे राज्यकर्ते असल्यावर दुसरे काय होणार, असा टोला त्यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील सुमारे 24 लाख 51 हजार तरुणांनी या पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केल्याचे उघड झाले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या काळात देशभरातील नोंदणीचा आकडा तब्बल 2 कोटी 39 लाख एवढा मोठा होता. त्यात महाराष्ट्रातील संख्या 19 लाख होती. आता हीच संख्या साडेचोवीस लाखांवर गेली आहे. म्हणजे रोजगार निर्मिती तर सोडा, नोंदणी करणाऱ्या बेरोजगारांची संख्या पाच लाखांनी वाढली आहे. म्हणजे नोंदणी न केलेल्या बेरोजगारांचा आकडा त्याच्या कित्येक पट जास्त असणार हे उघड आहे. मग गेले कुठे तुमचे तथाकथित रोजगार? कुठे विरले तुमचे रोजगार निर्मितीचे वादे आणि दावे? अशी सरबत्तीही त्यांनी केली आहे.
आज देशात सर्वात मोठी समस्या बेरोजगारी हीच आहे. 10 पैकी 8 जणांना आज नोकरी हवी आहे. केंद्र सरकारच्या पोर्टलवर रोजगार इच्छुकांच्या नोंदणीच्या ज्या लाटा आदळत आहेत, त्यातूनही बेरोजगारीचा वणवा देशात कसा पसरत आहे, हेच दिसून येत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे. (Thackeray Vs BJP: Uddhav Thackeray’s criticism of the project that went to another state)