घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहू नये' यासाठी कृषीमंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

‘पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहू नये’ यासाठी कृषीमंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

Subscribe

नाशिक : खरीप पीकाच्या हंगामासाठी शेतकर्‍यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच जिल्हाधिकार्‍यांनी पीक कर्जासंदर्भात विविध बँकांसोबत बैठका घेऊन पीककर्ज वाटपाचा आढावा घ्यावा. पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दीष्ठ्य पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकार्‍यांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यावेळी सत्तार पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांना बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. कृषी विभागाने प्रत्येक गाव पातळीवर नियोजन करुन खते व बियाणे उपलब्धतेसंदर्भात ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती देण्यासोबतच बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याबाबत मार्गदर्शन करावे. शेतकर्‍यांची अडवणूक होऊ नये यासाठी खते, कीटकनाशके यांची भरारी पथकाद्वारे तपासणी करावी. बाहेरील राज्यातील बोगस बियाणे आपल्या जिल्ह्यात येणार नाही याबाबत दक्षता घेवून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईच्या सूचनाही सत्तार यांनी दिल्या.

- Advertisement -

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेप्रमाणे कांदाचाळीबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाणार आहे. तसेच, शेतीपंपासाठी आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा होईल यादृष्टीने विद्युत विभागाने नियोजन करावे. प्राधान्यक्रमाने पाणीपुरवठा होण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण विभागाने योग्य ते नियोजन करावे. कृषी विभागाने जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना पीक फेरपालट पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहीत करावे. कृषी विभागातील 80 टक्के पदे भरण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असेही कृषीमंत्री सत्तार यांनी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाबीजचे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री, कृषी संचालक (फलोत्पादन) कैलास मोते, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे, कृषी संचालक (गुण नियंत्रण) विकास पाटील, कृषी संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) सुभाष नागरे, कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांबळे, कृषी संचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन) रवींद्र भोसले, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त (महसूल) संजय काटकर, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक (पुणे) रफिक नाईकवाडी, विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

नवे जुने पद्धत नको : गमे

बैठकीत बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, खरीप पीक कर्ज वाटपात नवे जुने ही पद्धत न वापरता प्रत्यक्ष कर्जवाटप करावे. जेणेकरुन अनधिकृत सावकारी व्यवसायाला आळा बसेल. बोगस बियाणे, खतांचे वाटप टाळण्यासाठी तालुकापातळीवरील समित्यांचे काम प्रभावीपणे करा. ‘मिलेट’ मिशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात राबवून खरीप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहनही गमे यांनी केले.

- Advertisement -

असे आहे विभागाचे खरीप हंगाम नियोजन

आगामी खरीप हंगामासाठी 26 लाख 87 हजार 36 हेक्टरनुसार कृषी विभागाचे पेरणीचे उद्दीष्ठ्य आहे. नाशिक जिल्ह्यात 6 लाख 27 हजार 141 हेक्टरनुसार पेरणीचे नियोजन आहे. अहमदनगर जिल्ह्यात 6 लाख 49 हजार 730, जळगाव – 7 लाख 56 हजार 600, धुळे – 3 लाख 79 हजार 600 व नंदुरबार – 2 लाख 73 हजार 965 हेक्टरनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -