मुंबई : शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे भांडण टोकाला पोहोचले आहे. त्यांनी एकमेकांच्या गद्दारीचे ‘पुरावे’च जाहीर केले. त्यामुळे शिंदे यांच्या टोळीचा ‘डीएनए’ही समोर आला असल्याचा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
हेही वाचा – ‘हे’ थेट भाजपात सामील का होत नाहीत? ठाकरे गटाची शिंदे गटावर जहरी टीका
मुख्यमंत्री शिंद्यांची टोळी सध्या कोणत्या अवस्थेतून जात आहे? ते पाहायला हवे. त्यांच्या टोळीतील दोन प्रमुख लोक गजानन कीर्तिकर व रामदास कदम यांनी एकमेकांवर गद्दारीचे आरोप-प्रत्यारोप केले. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेशी पहिली गद्दारी व आता जेथे आहेत तेथे दुसरी गद्दारी, असे सामना दैनिकातील अग्रलेखातून ठाकरे गटाने म्हटले आहे.
शिंदे कधी एखाद्या तीर्थस्थानी असतात तर अनेकदा दिल्लीचरणी. आता ते मन रमविण्यासाठी स्वतःला भाजपाच्या प्रचारात गुंतवून घेत आहेत. बहुधा कीर्तिकर आणि कदम यांच्या वादाच्या त्राग्याने मनःशांतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार राज्यांत प्रचारास निघाले आहेत. नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही, हे त्यांना वर्षभरात समजले हे बरे झाले, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.
हेही वाचा – “एकनाथ शिंदेंची अंतर्वस्त्र पाहिली तर…”, संजय राऊतांची बोचरी टीका
मुख्यमंत्री शिंदे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत
कै. राम गणेश गडकरी यांचे ‘एकच प्याला’ हे संगीत नाटक प्रख्यात आहे. तळीराम नावाचे एक अट्टल दारूबाज पात्र गडकऱ्यांनी या नाटकात रंगवले आहे. या तळीरामाने ‘आर्य मदिरा मंडळ’ नावाची दारूबाजांची एक संस्था निर्माण केलेली असते. वे.शा.सं. शास्त्रीबुवा व अल्लाबक्ष ही त्यातील दोन प्रमुख पात्रे. भरपूर दारू ढोसल्यानंतर या दोघांतील वैचारिक वादास तोंड फुटते. गंमत अशी की, दारूच्या नशेत ही दोन पात्रे आपल्या मूळ भूमिका विसरून उलट बाजू घेऊन भांडतात. शास्त्रीबुवा इस्लामची थोरवी सांगतात तर अल्लाबक्ष हिंदू धर्माची महती गातात. अर्थात, दारूच्या नशेत दाढीधारी शास्त्रीबुवा एक काम चोख बजावतात. अल्लाबक्ष यास ते, ‘‘शाब्बास, अल्लाबक्ष, आज तुम्ही हिंदू धर्माची लाज राखलीत!’’ अशी शाब्बासकी देतात्, असे या अग्रलेखात नमूद केले आहे.
हेही वाचा – प्रशासनला विरोध करण्याचे काम माझे असेल, अनधिकृत बांधकामावरून आव्हाडांचा थेट इशारा
‘एकच प्याला ‘नाटकातील ‘आर्य मदिरा मंडळा’त होणारे हे नाटक आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत वावरत आहेत व ते भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत आहेत. सत्य पायदळी तुडवून त्यांनी ‘खोटे’ छातीशी धरले आहे. महाराष्ट्राचे ‘अल्लाबक्ष’ भाजपच्या प्रचारास निघाले आहेत. त्यांची ‘आखरी मंजिल’ तीच आहे, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने केली आहे.