नाशिकमधील निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्यांने लिलावासाठी आणलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्याने १०६४ रुपयांची मनीऑर्डरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. मात्र, आज नैताळे येथील पोस्ट कार्यालयात ही मनीऑर्डर परत आली. या मनी ऑर्डरवर पंतप्रधानांकडून वा कार्यालयाकडून स्वीकारण्याबाबत कुठलीही पोहोच पावती मिळून आली नाही. यामुळे साठे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. मनी ऑर्डर केल्यानंतर तरी सरकारला जाग येईल. कांद्याचा भाव वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र, याबाबत कुठलाही दिलासादायक असा शब्द पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
कांद्याला भाव मिळावा म्हणून केले होते मनी ऑर्डर
संजय साठे या शेतकऱ्याने शेतातील कांदा निफाड बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. क्विंटलमागे या शेतकऱ्याला १५१ रुपये भाव मिळाला. त्यामुळे रागाच्या भरात मिळालेल्या पैशाची पंतप्रधानांना मनीआर्डर करत निषेध नोंदविला.कांदा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला अवघे १ हजार ६४ रुपयांची पावती मिळाली. कांद्याला आलेल्या खर्चापेक्षा खूपच कमी पैसे मिळाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने मिळालेली रक्कम निफाड पोस्ट ऑफिसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर केली होती.
मनीऑर्डर परत आता
केंद्र दखल घेत यावर काहीतरी निर्णय घेईल असे वाटत होते. मात्र मनीऑर्डर परत पाठवत कांदा प्रश्नावर सरकारने वरती हात केले आहेत. दरम्यान, सर्वसाधारण शेतकरी असलेले संजय साठे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत का? याबाबत चौकशी सुरु झाली होती. अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरातील आणि मित्र परिवारात याबाबत चौकशी केली होती. यावरून नाराज असलेले शेतकरी मनी ऑर्डर कुठल्याही आश्वासना शिवाय परत आल्यामुळे अधिकच संतापात आहेत.