मुंबई : सन 2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करून पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे, अशी आनंदाची बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, ट्रिपल इंजिन आणि तथाकथित विकास या भ्रामक संकल्पना असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.
आदरणीय फडणवीस साहेब,
प्रथमत , DPIIT च्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत देशात सर्वाधिक 36,634 कोटी रुपयांची #FDI आणल्याबदल महाराष्ट्र शासनाचे विशेषता आपले मनापासून अभिनंदन.
डबल –ट्रिपल इंजिन सरकारची कामगिरी म्हणून आता रोज जाहिराती आणि भाषणामध्ये या गोष्टी बडवल्या… https://t.co/BAQvy1AgSl pic.twitter.com/zLkMgdtdp6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2023
डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेली एफडीआय अधिक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरू आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे, असे फडणवीस यांनी ट्वीट केले आहे.
हेही वाचा – मोदींकडून राखी पौर्णिमेनिमित्त महिलांना भेट; गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपये कपात
त्याच ट्वीटच्या अनुषंगाने रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. डीपीआयआयटीच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत देशात सर्वाधिक 36,634 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक आणल्याबदल महाराष्ट्र शासनाचे, विशेषत: फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन. डबल –ट्रिपल इंजिन सरकारची कामगिरी म्हणून आता रोज जाहिराती आणि भाषणामध्ये या गोष्टी बडवल्या जातीलही, परंतु ज्या विकासासाठी सिंगलचे डबल, डबलचे ट्रिपल इंजिन झाले त्याप्रकारचा विकास महाराष्ट्रात होतो आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते जून याच कालावधीत महाविकास आघाडी सरकारने 40,386 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंत आणली होती. मविआ सरकारने आणलेली ही गुंतवणूक यंदाच्या डबल-ट्रिपल इंजिन सरकारपेक्षा 3,752 कोटींनी अधिक आहे. यावर्षी डबल-ट्रिपल इंजिन सरकारच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांत राज्यात 69,870 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक आली. पण गेल्या वर्षी मविआ सरकार काळात याच सहा महिन्यांत 83,692 कोटीची विदेशी गुंतवणूक आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
हेही वाचा – स्वत:ला सिद्ध करण्याऐवजी स्वत:ला शोधा, आनंद महिद्रा यांचा ‘त्या’ विद्यार्थ्यांना सल्ला
ऑक्टोबर 2019 ते जून 2022 या 33 महिन्यांच्या मविआ सरकारच्या कालावधीत महाराष्ट्र 3.29 लाख कोटीच्या गुंतवणुकीसह देशात पहिल्या क्रमांकावर होता. आमच्या मविआ सरकारच्या 33 महिन्यांत कोरोनासारखी संकटे असताना देखील दर महिन्याला 10,000 कोटींची विदेशी गुतंवणूक येत राहिली. ट्रिपल इंजिन सरकारच्या 12 महिन्यांत मात्र सर्व काही आलबेल असताना देखील दर महिन्याला केवळ 9,555 कोटींची विदेशी गुंतवणूक आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याचा अर्थ आमचे सिंगल इंजिन सरकार या ट्रिपल इंजिन सरकारला भारी होते, असा घ्यायचा की ट्रिपल इंजिनचा राज्याला काही फायदा झाला नाही असा घ्यायचा? असा सवाल करत, या आकडेवारीवरून ट्रिपल इंजिन आणि तथाकथित विकास या दोन्ही केवळ भ्रामक संकल्पना असून यामुळे राज्याच्या जनतेला कुठलाही फायदा झालेला नाही, हेच सिद्ध होते, असा पलटवार रोहित पवार यांनी केला आहे.