पुणेः इथल्या तिजोरीच्या चाव्या भरणेंच्या हातात असल्या तरी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात असल्याचं सांगत मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”?, असं अजित पवार म्हणालेत. अजित पवारांच्या विधानानं कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच हशा पिकला. बारामतीतल्या एका सभेत अजित पवार बोलत होते.
अजित पवारांचा बारामतीतल्या सभेत निधी वाटपावर बोलताना तोल सुटला. विषय निधीवाटपाचा आहे आणि ती सगळी सूत्रं सध्या आमदार दत्ता भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलीत. त्यामुळे मामा इतर आमदारांचाही विचार करत जा, इतरांनाही निधी देत जा, असेही अजित पवार म्हणाले.
मलाही भरणेंकडे निधी मागावा लागतो. कारण इथल्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. इथल्या तिजोरीच्या चाव्या भरणेंच्या हातात असल्या तरी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”?, असंही अजित पवारांनी म्हटलंय. अजित पवारांच्या या विधानानंतर कार्यकर्त्यांना एक हास्यकल्लोळ केला.
विशेष म्हणजे अजित पवार ग्रामीण धाटणीत बोलताना बऱ्याचदा बोलण्याच्या नादात भलतंच काही तरी बोलून जातात आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकतो, पण विरोधकांना एक आयतं कोलीत मिळतं. अजित पवारांच्या विधानांवरून बऱ्याचदा वाद होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असतानाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हटलं होतं, त्या विधानाचीही बरीच चर्चा झाली होती. पण नंतर त्यांनी चुकून बोलून गेल्याचं सांगितलं होतं. गेल्या काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी धरणातल्या पाणीसाठ्यावरून केलेलं विधानावरूनही बराच गदारोळ झाला होता. अजूनही धरणात पाणी नाही तर मी … काय हे वक्तव्य लोकांच्या स्मरणात आहे. विरोधकांकडून त्या विधानाचा वारंवार ठेवणीतल्या अस्त्रासारखा वापर केला जातो. खरं तर त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्याचा मनस्ताप त्यांनाही बऱ्याचदा झाला आहे. ते त्यांनी भर सभेत अनेकदा बोलूनही दाखवलं आहे. सकाळी सातच्या आत कामाला सुरुवात करणारा नेता म्हणून अजित पवारांची ओळख आहे.
हेही वाचाः आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा; नितेश राणेंच्या मतदारसंघात करणार एन्ट्री