नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. परंतु या सोहळ्याला गालबोट लागलं असून १४ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली. त्याचप्रमाणे या घटनेच्या कथित चित्रफिती देखील समाजमाध्यमांवर प्रसृत झाल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या घटनेतील मृतांचा पोस्ट मॉर्टम अहवाल समोर आला असून मृतांमधील काही जण आधीपासूनच व्याधीग्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे.
अहवालात नेमकं काय?
मृतांमधील काही जण आधीपासूनच व्याधीग्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच १४ पैकी १२ जणांनी सात तासांपासून काहीच खाललं नव्हतं. त्यामुळे भूक आणि उन्हामुळे हा मृत्यू ओढावल्याचं अहवालातून समोर आलं आहे. पाण्याची देखील सोय या कार्यक्रमात करण्यात आली होती. परंतु काही जणांपर्यंत ते पाणी पोहोचलंच नाही. तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन असल्यामुळे काहींना सावलीचीच गरज होती, असं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या एका दिवसाआधी पनवेल जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणी करताना त्यांनाही उन्हाचा त्रास जाणवला. परंतु ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी वरिष्ठांना कळवली नाही, असं एका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
नेमके काय घडले?
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहाण्यासाठी जवळपास २० लाख श्रीसदस्य उपस्थित राहिल्याची माहिती मिळाली आहे. या सोहळ्यानंतर काही श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. अतिउष्णतेमुळे काही श्रीसदस्य आजारी पडले. तर उन्हामुळे काही श्रीसदस्यांना चक्कर आली. यानंतर त्या सर्व श्रीसदस्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा : खारघर उष्माघाताचे 14 बळी