मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. परमबीर सिंग यांनी त्यांच्या याचिकेत महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्लांच्या फोन टॅपिंगच्या अहवालाचा मुद्दा आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा मुद्दा समोर आणला. यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग अहवालाचा दाखला दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग अहवालाचा दाखला दिल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक दिसले. रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅप केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. त्या भाजपधार्जिण्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. दरम्यान, आता पुन्हा एकदा राषट्रवादीने फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा उल्लेख सापडतो, नेमके हेच धागे पकडून
देवेंद्र फडणवीस आरोप करतात. यामधून देवेंद्र फडणवीस, रश्मी शुक्ला आणि भाजपाच्या सत्ताकाळातील आयपीएस अधिकारी यांचे कसे परस्परसंबंध होते हेच आज उच्च न्यायालयात उघड झालं,” असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा उल्लेख सापडतो, नेमके हेच धागे पकडून @Dev_Fadnavis आरोप करतात, यामधून देवेंद्र फडणवीस, रश्मी शुक्ला आणि भाजपाच्या सत्ताकाळातील आयपीएस अधिकारी यांचे कसे #Nexus होते हेच आज उच्च न्यायालयात उघड झाले.
— NCP (@NCPspeaks) March 31, 2021