देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून आता शहरांसह खेड्या पाड्यांत देखील कोरोनाचा शिरकाव होताना दिसतोय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण वाढत आहे. ग्रामीण जनतेत कोरोना या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याबरोबरच कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याच्या पंचायत राज संस्थांना प्रयत्नांना सहकार्य करणे तितकेच महत्वाचे आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात दिला आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाची चैन ब्रेक करण्याचा नांदेड जिह्यातील भोसी गावाने अनोखा मार्ग दाखवला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचणी सुविधा आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा यांची कमतरतेमुळे ग्रामीण भागात कोरोनाला रोखणे हे अवघड आहे. असे असले तरी भोसी गावाने या कमतरतानांच आपली बळकट बाजू बनवून , कोरोनाच्या संकटात गावाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सहा हजार लोकसंख्या असलेल्या भोसी या गावाने कोरोनामुक्तीसाठी अवलंबलेला मार्ग ही असाच एक यशस्वी प्रयत्न असून आता प्रशासन जिल्ह्यातील इतर गावांमध्ये त्याचे अनुकरण करणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींना इतरांच्या संपर्कात येऊ न देणे , कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळणे अशा साध्या उपायांच्या मदतीने पुरेशा आरोग्य सुविधा नसलेली गावेही कोरोनामुक्त होऊ शकतात
– प्रकाश देशमुख भोसीकर, जिल्हा परिषद सदस्य
भोसी पॅटर्नची होतेय चर्चा
एका लग्न समारंभांनंतर भोसी गावात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी पुढाकार घेतली आणि ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने गावात आरोग्य शिबीर आयोजित करून त्यात गावकऱ्यांच्या रॅपिड अॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर कोरोना चाचण्या केल्या. त्यात तब्बल ११९ गावकरी बाधित निघाले.
या चाचण्यांमध्ये बाधित आढळलेल्या सर्व गावकऱ्यांचा गावातील अन्य व्यक्तींशी संपर्क टाळून ,संसर्गाची ही चैन ब्रेक करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपापल्या शेतात १५ ते १७ दिवस विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. शेतमजूर आणि स्वतःची शेती नसलेल्या अन्य बाधितांची सोय जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी आपल्या शेतात एक ४० बाय ६० आकाराची शेड उभारून त्यामध्ये केली.
या गावकर्यांनी १५ ते २० दिवस विलगीकरणात काढल्यानंतर त्यांची तालुक्याच्या गावी आरोग्य तपासणी झाल्यानंतरच त्या सर्व व्यक्ती कोरोनामुक्त व्यक्ती म्हणून गावात परतले. विशेष म्हणजे गावातील कुठल्याही रुग्णाला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले नाही.