मुंबईः शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झालाय हे अख्ख्या जगाला माहीत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता भाजपच्या प्रसाद लाड यांना टोला लगावलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं आक्षेपार्ह विधान भाजपा आमदाराने केलं होतं. त्यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपलं मत व्यक्त केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा करण्याकरिता जात आहेत. त्यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
ते म्हणाले, आज हिंद हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा होईल. 11 तारखेला देशाचे पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते त्याचं लोकार्पण होईल. हा एक आनंदाचा 11 तारखेचा दिवस असेल. नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर समृद्धी महामार्ग आहे, तो लोकांसाठी खुला होईल. लोकांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे त्याच्या नियोजनाची तयारी पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. यात कोणतंही डायव्हर्शन नसून नागपूर ते शिर्डी कनेक्टिव्हिटी लोकांना मिळेल, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
विदर्भ, मराठवाड्याला जोडणारा हा समृद्धी महामार्ग प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या कामाच्या पूर्णत्वाकडे त्यांनी जातीने लक्ष दिलं होतं. मधल्या काळात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाचे काम रखडले होते. मात्र, आता जलद गतीने हे काम करून नागपूर ते शिर्डी असा मार्ग 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत. सकाळी 10.30 पासून त्यांचा समृद्धी महामार्गाचा ( झिरो माईल गार्डनपासून) पाहणी दौरा सुरू झाला असून, आता नागपूर ते शिर्डी अशा 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाची रस्ते मार्गाने पाहणी करून संध्याकाळी 5.30 वाजता शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर शिर्डीवरून दिल्लीला जी-20 परिषदेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पार पडणाऱ्या विशेष बैठकीसाठी रवाना होतील.
हेही वाचाः शिवरायांवरून भाजपाचा नेता पुन्हा बरळला, म्हणे महाराजांचा जन्म कोकणातला!