नाशिक : पाकिस्तानी नागरिक असलेल्या सीमा हैदर ही महिला छुप्या मार्गाने भारतात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एक भारतीय महिलेने दुबईमध्ये पाकिस्तानी व्यक्ती सोबत लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ती काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा भारतात देखील परतली आहे. एका बाजूला काही महिन्यांपूर्वी मालेगाव हे पीएफआय संघटनेचा गड असल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता ही महिला देखील शहरात दाखल झाल्याने अनेक चर्चांना उधाण आलंय. एटीएस कडून याबाबत सखोल तपास देखील केला जात आहे.
मालेगावात एनआयएने पीएफआयच्या एका संशयताची चौकशी केल्याची घटना ताजी असतानाच आता एटीएस ने आयेशा नगर भागात राहणाऱ्या एका महिलेची चौकशी केल्याचे समोर आले असुन चार मुलांची आई असलेल्या या महिलेने दुबईत एका पाकिस्तानीशी लग्न केले असल्याचा दावा करण्यात आला असुन पाकिस्तानी व्यक्ती आयएसआयमध्ये आहे. त्याच्यासोबत राहिल्यानंतर वर्षभरानंतर ही महिला मुंबईत परतली व तिथून मालेगावला आल्याचे एका इमेल द्वारे कळाले. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या महिलेचे आई वडील मालेगावच्या आयेशा नगर मध्ये राहतात मात्र गेल्या दोन दिवसांपासून तेही गायब आहेत केंद्रीय तपास यंत्रणाना आलेल्या एका ई-मेल वरून हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) 18 ऑगस्ट रोजी एक ई-मेल प्राप्त झाला. त्यात म्हटले आहे की, 32 वर्षीय चौघांची आई मुंबईहून दुबईला गेली होती. महिलेने दुबईत एका पाकिस्तानीशी लग्न केले. पाकिस्तानी व्यक्ती आयएसआयमध्ये आहे. वर्षभरानंतर ही महिला मुंबईत परतली आहे. या महिलेने तिच्या पाकिस्तानी नवऱ्यासोबत लिबियाचा देखील दौरा केला असल्याचे या इमेल मध्ये म्हटले आहे. त्या अनुषंगाने एटीएस तपास करत असुन लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
चार मुलांची आई असलेल्या एका महाराष्ट्रीय महिलेने दुबईत एका पाकिस्तानी पुरुषाशी लग्न केल्याचा दावा करणाऱ्या ई-मेलची महाराष्ट्र एटीएस चौकशी करत आहे. त्याच्यासोबत पाकिस्तान आणि लिबियाचाही प्रवास केला. या पाकिस्तानी नागरिकाचे नातेवाईक आयएसआय या गुप्तचर संस्थेमध्ये काम करतात, असे या ई-मेलमध्ये म्हटले आहे. ४ ऑगस्ट रोजी ही महिला मुंबईत परतली. 18 ऑगस्ट रोजी ई-मेल पाठवण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, सीआयएसएफ आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनाही हा ई-मेल पाठवण्यात आला होता. ही महिला सध्या मालेगाव येथे आई-वडिलांसोबत राहते. स्थानिक पोलिसांनीही त्याची चौकशी केली. तिचा विवाह 2011 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यावसायिकाशी झाला होता. महिलेच्या पतीचीही एटीएस आणि आयबी अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे.या महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री नंतर लग्न केल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिने पतीचे घर सोडले होते. पतीने 23 डिसेंबर 2022 रोजी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.मात्र याचा कुठल्याही प्रकारचा तपास न झाल्याने आता हे प्रकरण नेमकं काय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
ई-मेलचाही तपास सुरू
जो ई-मेल प्राप्त झाला आहे तो कदाचित खोडसाळ पणाने केला असू शकतो अशीही शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत आम्ही आणि एटीएस तपास करत आहे. त्याबद्दल आम्ही आता काही सांगू शकत नाही गोपनीयता राखण्यासाठी आम्ही फक्त तपास करतोय लवकरच या सर्व घटनेचा संपूर्ण पर्दाफाश होईल असेही सांगण्यात आले.