मुंबईः विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून, विरोधकांनी पायऱ्यांवरच गोंधळ घातला आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. आता त्यावरून जोरदार राजकारण रंगू लागलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी यावरून शिवसेनेला कोपरखळी लगावलीय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनाही पत्रकारांनी विचारले असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलीय. चंद्रकांत पाटलांनी थेट रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, अशी उपरोधिक टीका केलीय. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणं स्वाभाविक आहे. आमचा एवढाच आग्रह आहे की, परंपरा आणि नियमानुसार कोणाला तरी चार्ज द्यावा लागतो. तीसुद्धा एक लंबी प्रोसेस असते. कारण तो चार्ज राज्यपालांकडे रजिस्ट्रर करावा लागतो. राज्यापालांना किती मानायचं नाही असं ठरवलं तरीसुद्धा राज्यपालांशिवाय काही करता येत नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी अधोरेखित केलंय.
अन्य दोन पक्षांबद्दल त्यांचा अविश्वास स्वाभाविक आहे. कारण त्यांनी घेतला चार्ज तर ते सोडणारच नाहीत. पण त्यांच्या पार्टीमध्येही कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यायला पाहिजे. आदित्य ठाकरेंवरही विश्वास नसेल तर रश्मी ठाकरेंकडे चार्ज द्यावा, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.
दुसरीकडे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलंय. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री एकदम बरे आहेत. ते अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. कालसुद्धा कॅबिनेट बैठक झाली. त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते येतील, असं उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय. जेव्हा सीएमसाहेब येतील तेव्हा आपल्या सगळ्यांना कळेल, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.
राष्ट्रपती राजवट लागू होणार?
राष्ट्रपती राजवट येणं हे काही स्वप्न असू शकत नाही. ती येण्यासाठी सर्व कारणं घडलेली आहे. त्यामुळे कधी राष्ट्रपती राजवट लागू करायची हा केंद्राचा प्रश्न आहे. एखादी गोष्ट चुकीची असली आणि जर ती प्रत्यक्षात साकार होत नसेल तर ती गोष्ट स्वप्नात बघायची असते. ही व्यवहारातच आली पाहीजे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मोदीचं मुखदर्शन जरी झालं नसलं आणि संसदेत जरी आले नसले. तरी ते सगळ्या बाजूंनी अॅक्टिव्ह आहेत. राज्यशासन हे मुख्यमंत्र्यांविना चालणार नाही. असं देखील पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकदम बरे, योग्य वाटेल तेव्हा ते येतील : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे