मुंबईः विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी समृद्धी मार्गावरच्या दौऱ्याचा किस्सा विधानसभेत सांगितलाय. ते म्हणाले, मला आधीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. महाविकास आघाडीमध्ये दोन वेळा मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, कारण साडेसहा कोटी रुपये डेफिझेट म्हणजेच कर्ज होतं. मला फडणवीस साहेब म्हणाले शिंदे साहेब चिंता करू नका. तुमच्या पाठीशी मी आहे आणि मला त्यांनी समृद्धी महामार्गाचं काम दिलं. मला बुडीत झालेले खातं दिलं. तरी मी ते खातं सांभाळलं आणि समृद्धी महामार्ग आज पूर्णत्वास जातोय, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
दादा मी स्वतः सांगतो फडणवीस साहेब म्हणाले हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तुम्हाला करायचं आहे. हा राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. हा हजारो, लाखो, करोडो लोकांना फायदा देणारा आहे. मी जोखीम उचलून जायचो. माझे तिकडे पुतळे लावलेले असायचे. आंदोलन माझ्याविरोधात झाले. एकदा तर आमचं विमान क्रॅश होणार होतं. मोपलवारला विचारलं तर तो देवाचाच ध्यास करत बसला होता. आमचा कार्यक्रम आटपणार होता, असंही ते म्हणालेत.
पावसाळ्यात आम्ही बुलडाण्याला चाललो होतो, मी स्वतः विटनेस म्हणून सही केली. त्यांना सरकार पैसे देईल की नाही हा विश्वास नव्हता. मी म्हटलं दोन तासांत आरटीजीएस होईल. विमानात बसलो इकडे आलो तर सरदारजी पायलट होता. त्यानं ते विमान त्या ढगात घुसवलं. नंतर आम्ही 10-10 ते 15-15 फूट खाली उडत होतो. नंतर उतरल्यावर मला बोट दाखवून असं करत होता. तो म्हणाला मला काही पर्याय नव्हता, ढगामध्ये गेल्याशिवाय, आमच्या मागून येणारं विमान आलं आणि अहमदाबादला लँड झालं. ही वस्तुस्थिती असून, समृद्धी महामार्गामुळे लाखो लोकांना त्याचा फायदा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मी फडणवीसांचं मनापासून इथे अभिनंदन करेन. त्यांनी मला काम करण्याची संधी दिल्याचंही म्हटलंय.
हेही वाचाः शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्धार