औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी रात्री अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली. जिल्ह्यातील घनसावंगीत, अंबड याभागात अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस आल्याने बळीराजाची तारांबळ उडाली. अचानक बरसलेल्या पावसामुळे गहू, ज्वारीसारख्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वादळी वारा तसेच काही भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
जालनातील या भागात पावसाची हजेरी
जालना जिल्ह्यात रात्री ९ च्या सुमारास अचानक ढग दाटून आल्यानंतर काहीच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला, सुमारे दहा मिनिटे अंबड आणि घनसावंगीच्या भागात पावसाने हजेरी लावली तर वसाहतींच्या भागात रिमझीम पाऊस झाला. यासोबतच जालनातल्या बदनापूर, भोकरदन या परिसरात देखील पाऊस बरसला. रात्री उशीरा पावसाने हजेरी लावल्यामुळे नवीन जालनात वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता. ‘राज्यातील सरकार एकीकडे कर्जमाफीचा दिलासा देत असताना, अचानक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाच्या दारी अवकाळी पावसाचे संकट उभे राहणार का?’ असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
जालना जिल्ह्यातील अंबड शहरात दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्री जोरदार वारा आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाने आपली हजेरी लावल्याने परीसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. यामुळे गहू ज्वारी सारख्या काढणीत आलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची पिक वाचवण्यासाठी धावपळ झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा – मुंबईत मे २०२० पर्यंत संपूर्ण प्लास्टिक बंदी !