केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला. या अर्थसंकल्पात बाजारपेठांवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. सादर केलेल्या अर्थसंकल्पात दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमती वाढवल्याचे पहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाचा काय फायदा असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला. यावर शिवसेना नेत संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीच नाही. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाचा काहीच उपयोग नाही असे म्हणत संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टिका केली आहे. अर्थसंकल्प सर्वसामान्यांची निराशा करणारे आहे. या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काही दिले नाही, शहरातल्या लोकांनाही याचा काही फायदा झालेला नाही, पेट्रोलच्या किंमती मात्र वाढवून ठेवल्या आहेत. हे सर्व चिंताजनक असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
केंद्रसरकारने कांजूरचा कारशेड प्रकल्प अडकवून ठेवला आहे. महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवली. मात्र महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय होत आलाय. महाराष्ट्र देशाचे पोट भरतो मात्र महाराष्ट्राकडे कोणी पाहत नाही. अर्थसंकल्पातील आकडे किती खरे आणि किती खोटे हे पुढील काळात कळेल. काही लोक आता त्याचा अभ्यास करत असतील, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. त्याचबरोबर अर्थसंकल्पावर आर्थिक थापा मारणे बंद करा. सामान्य माणसाला भुकेची भाषा कळते. तरुणांना रोजगाराची भाषा कळते अशा सोप्या भाषेत अर्थसंकल्प सादर करावा, असेही ते म्हणाले.
नाशिक आणि नागपूरमध्ये मेट्रोसाठी निधी देण्यात आला आहे. नागपूर फेज २ आणि नाशिक फेज १ साठी प्रत्येकी २ हजार ९२ कोटी आणि ५ हजार ९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक नागपूरपेक्षा मुंबईची मेट्रो केंद्राने का रोखून ठेवली आहे असा प्रश्न या वेळी राऊतांनी उपस्थित केला. काही निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प तयार होत असेल तर त्याला देशाचे अर्थसंकल्प म्हणू नये,त्याला एका राजकिय पक्षाचे बजेट म्हणावे, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा – Union Budget 2021: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; विरोधकांचा गदारोळ