नाशिक : मनमाड-नांदगावदरम्यान मध्य रेल्वेतर्फे तयार करण्यात आलेल्या तिसर्या रेल्वेमार्गाची ताशी 130 किलोमीटर वेगाने यशस्वी चाचणी घेण्यात आली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर या मार्गावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू केली जाणार असून, वेळेची बचत आणि प्रवासी गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. जवळपास 1360 रुपयांचा खर्च करण्यात आला असून यामुळे ट्रेनचा खोळंबा कमी होण्यास मदत होणार आहे.
देशाच्या महत्वाच्या स्थानकांपैकी एक महत्वाचे स्थानक म्हणून मनमाड स्थानकाची ओळख आहे. मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या या स्थानकावर थांबतात. त्याचबरोबर येथूनच जाणार्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. याच मनमाड आणि नांदगाव या दोन स्थानकांदरम्यान विशेष गाडी ताशी 130 किमी वेगाने स्पीड ट्रायल घेण्यात आली. या चाचणीप्रसंगी भुसावळ मंडळ रेल प्रबंधक इति पांडेय, संबंधित शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान 25.9 किलोमीटरची मनमाड -नांदगाव तिसरी लाईन विद्युतीकरणासह यशस्वीपणे सुरू झाल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.
भुसावळ- मनमाड तिसर्या लाईनचा प्रकल्प 183.94 किलोमीटरचा आहे. 1360.16कोटी रूपये खर्चाच्या या भागात मनमाड-नांदगाव विभाग हा महत्वाचा टप्पा कठीण प्रयत्नातून पूर्णत्वास आला. मनमाड-नांदगाव विभागादरम्यान विद्युतीकरणासह 25.09 किमीची नवीन तिसरी मार्गिका 130 किमी प्रतितास वेगाची यशस्वी चाचणी आणि रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्या तपासणीनंतर कार्यान्वित झाली. यासह 183.94 किमी भुसावळ-मनमाड तिसरी लाईन आता 53 टक्के पूर्ण झाली आहे.
या संपूर्ण विभागात तिसर्या रेल्वे मार्गिकसाठी 47 पुलांची निर्मिती आवश्यक आहे. त्यात 6 मोठे व 41 लहान पूल आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मनमाड नजिक पांझण रेल्वे स्थानकाजवळ 700 मीटरच्या अंतरावर रॉक-कटिंगचे आव्हानात्मक काम यशस्वीपणे पूर्ण झाले. मनमाड-नांदगाव विभागात, पानेवाडी-हिसवळ, पांझण आणि नांदगाव यासह धोरणात्मक दृष्टया स्थित स्थानके आहेत. त्यामुळे प्रत्येक स्थानकाच्या यार्डात बदल करण्यात आले आहे. नॉन इंटरलॉक, सिग्नलींग आणि ओव्हरहेड एक्युमेंट, मॉडिफिकेशनचा समावेश आहे.
ही आहेत वैशिष्ठ्ये..
भुसावळ-मनमाड तिसरी लाईन करण्यात येत आहे. एकूण 183.94 किलोमीटरची ही लाईन असून यासाठी 1360 कोटी खर्च अपेक्षित आहे. हे काम करत असताना 96.81 किलोमीटरची लाईनचे काम पूर्ण झाले असून यात भुसावळ-पाचोरा-71.72 किलोमीटर तर मनमाड-नांदगाव 25.09 किलोमीटर असणार आहे. तर पाचोरा-नांदगाव या मार्गावरील 87.13 किलोमीटरचे काम सुरु आहे. या नवीन तिसर्या मार्गामुळे मुंबई-हावरा व्यस्त मार्गावरील मनमाड-भुसावळ विभागावरील गर्दी कमी होईल. आगामी नवीन तिसर्या लाइनची ही पायाभूत सुविधा व अपग्रेडची सुरू असलेली विविध कामे गाड्यांच्या चांगल्या गतीसाठी आहेत. यामुळे ट्रेनचा खोळंबा कमी होईल, अशी माहिती मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी दिली आहे.