नाशिक : अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र कायम असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पाऊणेदोन एकरात लागवड केलेल्या आल्याच्या पिकातून त्यांनी लाखोंची कमाई, करून एक नवा आदर्श शेतकर्यांसमोर ठेवला आहे.
महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पारंपरिक शेतीमध्ये अनेकदा फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. पांरपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी विविध प्रयोग करत असतात. काही शेतकर्यांनी तर मिश्र शेतीकडे मोर्चा वळवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने मिरचीच्या शेतीला प्राधान्य देतात. हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेपासून जवळ असल्याने शेतकर्यांनादेखील तेथील बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचे दिसून येते.
नंदुरबार जिल्ह्यातील जितेंद्र पाटील या शेतकर्याने आले शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. पाटील यांनी दोन एकरात १६ टन आल्याचे उत्पन्न घेतले आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रासह, गुजरात, मध्यप्रदेशच्या व्यापार्यांकडून जागेवरच त्यांच्याकडून ४० रुपये प्रति किलोने हे आले खरेदी केले जात आहे. शेती हा बिनभरवशाचा व्यवसाय आहे. मात्र, शेतीकडे पाहण्याचा शेतकर्यांचा दृष्टिकोन बदलला तर शेतीतूनही चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते हे जितेंद्र पाटील यांनी दाखवून दिले आहे. शेतकरी जितेंद्र पाटील यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी आले (अद्रक) शेती करत शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.
खर्च दोन लाख
जितेंद्र पाटील यांच्याकडे एकूण १४ एकर जमीन असून त्यांची काही जमीन त्यांच्या गावाजवळ आहे. गावाजवळील जंगली प्राण्यांचा उपद्रव, नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल यासारख्या कारणांनी पिकांचे मोठे नुकसान होत असे. त्यामुळे त्यांनी पाऊणेदोन एकर जमिनीत काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले. पाटील यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत कृषी महाविद्यालयातील तज्ञांच्या मदतीने आले शेती करण्याचे नियोजन केले. पाटील यांनी आल्याचे बियाणे नाशिक येथून २० रुपये किलोने खरेदी केले होते. मध्य प्रदेश मधील व्यापारी जागेवर ४० रुपये किलो दराने त्यांच्याकडून आले खरेदी करत आहेत. पाटील यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत दोन लाख रुपयांचा खर्च केला आहे. दोन एकरात १० लाखापर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे. खर्च वजा जाता आठ लाख रुपये निव्वळ नफा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.