मुंबई : या वर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे राज्यावर गंभीर दुष्काळाचे सावट आहे. ज्या मराठवाड्यावर हे सावट गडद आहे तेथे दोन दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सुमारे 50 हजार कोटींच्या ‘पॅकेज’ची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. एकीकडे दुष्काळ, नापिकी, त्यातून उद्भवलेला कर्जबाजारीपणा, त्यामुळे वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुसरीकडे मिंधे राज्यकर्त्यांच्या फसव्या घोषणा हे राज्यावरील एक गंभीर संकटच आहे, असा निशाणा ठाकरे गटाने साधला आहे.
हेही वाचा – आदित्य-L1 मिशन: सूर्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे; पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडलं आदित्य-L1
प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आज, मंगळवारी परंपरागत उत्साह आणि जोशात श्री गणरायांची प्राणप्रतिष्ठा होईल. घरगुती गणपती असोत की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे, सगळीकडे तोच उत्साह दिसेल. त्यातही महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी गणेशोत्सव हा श्रद्धा, भावना, आस्था आणि अपार चैतन्याचाच उत्सव असतो. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत श्रद्धा आणि चैतन्याच्या लाटाच उसळलेल्या दिसतील, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना देनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – आदित्य-L1 मिशन: सूर्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे; पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडलं आदित्य-L1
कितीही संकटे असली, प्रतिकूल परिस्थिती असली तरी गणपती बाप्पांचे आगमन आणि त्यांना दिला जाणारा निरोप धूमधडाक्यातच पार पडतो. यंदा कोरोनाचे सावट दूर झाले आहे. तथापि, त्याची जागा इतर अनेक संकटांनी घेतली आहे. देशासमोरील आव्हाने वाढतच आहेत आणि सर्वसामान्य जनतेवरील संकटांमध्येही दिवसागणिक भर पडत आहे. दिल्लीश्वरांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या माथी लादलेले हे संकट कायमचे दूर कर, अशीच प्रार्थना राज्यातील जनता आज श्रीचरणी करीत असेल, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.
लोकशाहीवरील विघ्न दूर कर!
‘हूल’ आणि ‘भूल’ ही सध्याच्या राज्यकर्त्यांची प्रमुख शस्त्रे आहेत. त्यांचा वापर करीत जनतेला एका वेगळ्याच भुलभुलैयात ठेवण्याचा उद्योग नऊ वर्षांपासून सुरू आहे. 2024साठीही त्यांचा तोच प्रयत्न आहे. मात्र या नऊ वर्षांच्या सत्तेने आपल्याला फक्त ‘कळा’च दिल्या, हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळे 2024मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचेच, असा निश्चय जनतेने मनाशी केलाच आहे. ‘गणराया, देशात वाढलेला दंभ आणि सुंभ, जनतेची इडापीडा नष्ट कर आणि लोकशाहीवरील विघ्न दूर कर!’ अशीच प्रार्थना तमाम गणेशभक्तदेखील आज घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांच्या चरणी करीत असतील, असा निशाणा ठाकरे गटाने साधला आहे.