मुंबई : ‘सामना’ माझ्यावर सातत्याने टीका करतो, असा नाराजीचा सूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सदनात काढला. तो तितकासा बरोबर नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे लोक नेहमी सांगतात, “आम्ही ‘सामना’ वाचत नाही.” पण त्यांचे सर्वोच्च बॉस ‘सामना’ची दखल घेतात व त्यावर भाष्य करतात हे चांगल्या नेत्याचे लक्षण आहे. टीकाकारांचे विचार समजून घेतले पाहिजेत, हीच खरी लोकशाही, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना कोपरखळी लगावली आहे.
हेही वाचा – किंग कोण? नरेंद्र मोदी की राहुल गांधी… भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे- प्रतिदावे
पंतप्रधान मोदी हे सध्या दिल्लीत राज्याराज्यांतील ‘एनडीए’ खासदारांच्या बैठका घेत आहेत. एका बैठकीत ते म्हणाले, ‘आता फक्त माझ्या नावावर मते मागू नका. तुमच्या कामावर मते मिळवा.’ याचा अर्थ असा की, फक्त मोदी नावावर मते मिळणार नाहीत हे त्यांनी स्वीकारले आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे.
त्या मित्रकाळात मोदी-शहा कोठेच नव्हते
महाराष्ट्र सदनात त्यांनी महाराष्ट्रातील ‘एनडीए’ खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे फोडलेले खासदार उपस्थित होते. त्यांच्यासमोर मोदी म्हणाले, ‘शिवसेनेशी युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली.’ मोदी यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर हे विधान केले. शिवसेना-भाजपा युतीचा ‘मित्रकाळ’ 25 वर्षांचा होता व त्या मित्रकाळात मोदी-शहा कोठेच नव्हते. 2014 सालात गुजरातची ही जोडी दिल्लीच्या राजकारणात अवतरली व त्यांनी ‘मित्रकाळ’ युती तोडली, असा थेट दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा – ‘पहाटेच्या शपथविधीप्रमाणे अजित पवार परत फिरणार’; राऊतांचा गौप्यस्फोट
कोणाला चुकीची माहिती देत आहेत?
मोदी 2019 चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ 2014 सालात भाजपाने तोडली. विधानसभेच्या एका जागेवरून भाजपाने युती तोडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते व युती तोडत आहोत, असे उद्धव ठाकरे यांना अधिकृतपणे सांगण्याची जबाबदारी पक्षाने खडसेंवर सोपवली होती. खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘युती तोडत आहोत’ असे सांगितले. मोदी यांना हे माहीत नसावे? ते कोणाला चुकीची माहिती देत आहेत? 2019 साली दिलेला शब्द पाळला नाही म्हणून दुसऱ्यांदा युती तुटली. एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्यास तेव्हा भाजपाने नकार दिला म्हणून युती तुटली. आता त्याच शिंदेंना भाजपाने मुख्यमंत्री केले. मोदी यांनी या घडामोडींवर भाष्य केले पाहिजे व खरे बोलायला हवे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.