देशातील बेरोजगारीच्या दरात एप्रिल महिन्यात वाढ झाली आहे. देशातील अनेक तरूण मुलं-मुली हे आज रोजगाराच्या शोधात आहेत. परंतु नोकऱ्या नसल्याने बेरोजगारी हे देशातील सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. पण याच मुद्द्याकडे ठाकरे गटाचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी भारतातील बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे सांगत याबाबतचे ट्वीट केले आहे. तसेच वाढणारी बेरोजगारी ही महाराष्ट्रासाठी चिंताजनक परिस्थिती असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
आदित्य ठाकरे यांचे ट्वीट
“एका जागतिक संस्थेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालाप्रमाणे भारतातल्या बेरोजगारी ८.११ टक्क्यांवर गेला आहे. शहरी भागात तर तो ९.८१% इतका वाढला आहे. ह्या सगळ्यात महाराष्ट्रात आलेलं अवकाळी सरकार मात्र महाराष्ट्रातले उद्योग बाहेर धाडण्यात पटाईत आहे. बल्क ड्रग पार्क, वेदांता फॉक्सकॉन, एयरबस – टाटा प्रकल्प ह्यासारखे महाराष्ट्राच्या युवकांना रोजगार मिळवून देणारे मेगा प्रकल्प शेजारच्या राज्यात घालवले गेले. त्यामुळेच महाराष्ट्रासाठी ही परिस्थिती जास्त चिंताजनक झाली आहे. ह्यावर युवकांनी संघटीत होऊन आवाज उठवायला हवा!” असे लिहित त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
एका जागतिक संस्थेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालाप्रमाणे भारतातल्या बेरोजगारीचा टक्का ८.११% वर गेला आहे. शहरी भागात तर तो ९.८१% इतका वाढला आहे.
ह्या सगळ्यात महाराष्ट्रात आलेलं अवकाळी सरकार मात्र महाराष्ट्रातले उद्योग बाहेर धाडण्यात पटाईत आहे. बल्क ड्रग पार्क, वेदांता…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 4, 2023
राज्याच्या बाहेर जाणाऱ्या उद्योगांवरून कायमच आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. उदय सामंत हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक अपयशी ठरलेले उद्योग मंत्री असल्याचे वक्तव्य त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेले होते. राज्यातील उद्योग धंदे हे सरकारच्या निष्काळजीपणामुळेच बाहेर जात आहेत, असे त्यांनी याआधी देखील सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेरोजगारीचे ट्वीट करत त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा – World Bank President : जागतिक बँकेची धुरा भारतीयाच्या हाती, अजय बंगा नवे अध्यक्ष
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या बेरोजगारीचा दर 8.11 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबर 2022 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. त्यावेळीही बेरोजगारीचा दर 8.11 टक्के होता, तर मार्च 2023 मध्ये तो 7.8 टक्के होता.
तर याबाबत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात शहरी भागातील बेरोजगारीचा दर 9.81 टक्क्यांवर पोहोचला होता. मार्च 2023 मध्ये तो 8.51 टक्के होता. तसेच ग्रामीण भागात हा दर मार्च 2023 मध्ये 7.47 टक्के इतका होता. जो आता मागील एप्रिल महिन्यात 7.34 टक्क्यांवर घसरला आहे.