मुंबई – विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीमुळे प्रचंड गोंधळ झाला. हा गोंधळ नाकारू शकत नाही. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत एकत्रित बसून चर्चा व्हायला हवी होती, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच, नाशिकच्या पार्श्वभूमीवर अमरावती आणि नागपूरबाबतही काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं होतं. अमरावतीची जागा शिवसेनेला मिळाली असती तर आम्ही आणखी जोरात लढलो असतो, असं संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत समन्वय झाला नसल्याचीही कबुली दिली.
संजय राऊत म्हणाले की, “अमरावती, नागपूरबाबत काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं होतं. अमरावतीच्या जागेवर काँग्रेसकडे उमेदवार नव्हता म्हणून त्यांनी आमच्याकडून उमेदवार घेतला. त्यापेक्षा आम्ही लढलो असतो. बुलडाण्याचे प्रमुख लिंगाडे यांनी तयारी केली होती. पण काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. ती जागा आम्हाला मिळाली असती तर आम्ही आणखी जोरात लढलो असतो.”
“विधान परिषद निवडणुकीतील गोंधळ नाकारू शकत नाही. काँग्रेसबाबत ही घटना घडली असली तरीही ही घटना महाविकास आघाडीत घडली आहे. विधान परिषदेच्या पाच जागांबाबात एकत्रित बसून चर्चा व्हायला हवी होती, ती झाली नाही. याबाबत मी कोणालाही दोष देत नाही,” असंही राऊतांनी पुढे स्पष्ट केलं.
तांबे भाजप पुरस्कृत उमेदवार? योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस#MyMahanagar https://t.co/vF84xDEfhm
— My Mahanagar (@mymahanagar) January 14, 2023
नाशिकबाबत कोणालाच दोष देता येणार नाही. उलट्यापालट्या सर्वंच पक्षात होत असतात. तांबे कुटुंबीय हे काँग्रसेचं निष्ठावान कुटुंब. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास कोणी दाखवायचा? भविष्यात महाविकास आघाडीने आणि प्रमुख नेत्यांनी समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, नाशिकमध्ये निवडणूक बिनविरोध होणार नाही, याचाही पुनरूच्चार संजय राऊतांनी आज केला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत आता कोणाच्या बाजूने कौल लागतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मविआच्या नावांना भाजपाचा विरोध, बीडीडी पुनर्विकासाच्या नामकरणावरून राजकारण तापणार?#MyMahanagar #BDDhttps://t.co/YWKrE4l6aS
— My Mahanagar (@mymahanagar) January 14, 2023