सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राजकारण ठवळून निघाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथमधील पूजा चव्हाण आत्महत्येला शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी ठाकरे सरकारवर सध्या विरोधकांकडून टीकेची झोड उठवली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या नावाचा थेट उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही याप्रकरणी आवाज उठवला. परंतु याप्रकरणी आवाज उठवल्याने अतुल भातखळकर यांनी आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोप केला आहे.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणीतील चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) पत्र पाठवले होते. परंतु आता अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. भातखळकरांनी ट्विट करत म्हंटले की, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत(Pooja Chavan Suicide Case) आवाज उठवल्यामुळे रविवारपासून मला धमक्यांचे फोन येतायेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे असा आरोप केला आहे.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे.
धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2021
धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे असा इशारा भातखळकरांना दिला आहे. अतुल भातखळकरांनी याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी, ‘शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे या प्रकरणी नाव पुढे आले आहे, या मंत्र्याचे आणि आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा सोशल मीडियात चर्चेत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. त्यानंतरच मला धमक्यांचे फोन येत आहे असे भातखळकर म्हणाले.