डोंबिवली : मुंबई, ठाणे तसेच आजूबाजूच्या शहरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न हा कायमच महत्त्वाची समस्या राहिलेला आहे. अनेकदा पालिकांकडून नोटीसा येऊन सुद्धा काही नागरिक हे धोकादायक इमारतींमधून दुसरीकडे स्थलांतरित करत नाहीत. अशीच एक घटना आज (ता. 15 सप्टेंबर) सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास डोंबिवलीत घडल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची इमारत कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आदिनारायण सोसायटीतील ही इमारत जुनी झाली होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना कालच (ता. 14 सप्टेंबर) दुसरीकडे स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर आज इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. (Three storied old building collapses in Dombivli)
हेही वाचा – खुशखबर! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी राज्य सरकारचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतील तडे गेले होते. ज्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून या इमारतील धोकादायक घोषित करत नोटीस दिली होती. त्यानंतर पालिकेकडून नोटीस येताच काही कुटुंबांनी सुरक्षितस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. तर काही कुटुंबे ही नोटीसीनंतर देखील इमारतीत वास्तव्यास होती. कालपासून डोंबिवलीमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. ज्यानंतर आज अचानाक सायंकाळी ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. त्याशिवाय महापालिका प्रशासन, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जे नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, त्यांना काढण्याचे प्रयत्न सुरू असून बचाव पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालेकिचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी माहिती देत सांगितले की, ही इमारत खचत आहे, असे समजल्यानंतर आमचे सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. पण तरीही काही नागरिक अडकले असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच, ही इमारत धोकादायक होती. या इमारतीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना याआधी नोटीस देण्यात आली होती. लोकांना बाहेरही काढण्यात आले होते. पण ते पुन्हा तिथे वास्तव्यास गेले. त्यानंतर आज ही दुर्घटना घडली. आजूबाजूच्या इमारतीदेखील खाली करण्यात आल्या आहेत. त्या इमारतीदेखील निष्कलीत अर्थात पाडून टाकण्यात येतील, असे केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.