गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चारकमान्यांसाठी एक दिलासाजनक बातमी आहे. यंदा चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव सुसाट असणार आहे. कारण पुणे- मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना सरकारने टोलमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवादरम्यान जाताना आता महामार्गावरील टोल नाक्यांवर टोल देण्याची गरज लागणार नाही, पण यासाठी कोकणवासियांना स्थानिक प्रशासनाकडून परवाना असलेले स्टीकर घ्यावे लागणार आहे. टोल माफीच्या निर्णयामुळे सुमारे दहा हजारांहून अधिक वाहनांना फायदा होणार आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून स्टीकर मिळालेल्या कोकणवासियांनाच याचा फायदा होईल.
सरकराच्या निर्णयानुसार, गणेशोत्सवानिमित्त पुणे आणि कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या आणि गणेश विसर्जनानंतर परताना वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. ही सेवा एस.टी बसेसनाही लागू होण्याची शक्यता आहे. 2018 पासून मुंबई- पुणे द्रूतगती मार्ग आणि कोल्हापूर मार्गे कोकणात जातना होणारी वाहनांची कोंडी रोखण्यासाठी सरकारने महामार्गावर यंत्रणा ठेवली होती.
यासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ‘गणेशोत्सव कोकण दर्शन’ नावाने एक स्टीकर देण्यात आले होते. यावर्षीही ही यंत्रणा राबवली जाणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र यासाठी स्थानिक पोलीस ठाणे आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंद करुनच हा स्टीकर मिळणार आहे.
दरवर्षी कोकणात पुण्याहून चिपळूणकडे जाणारी वाहने कराडपासून पाटणमार्गे, तर रत्नागिरी, राजापूरला जाणारी वाहने किणी वाठार वारणामार्गे आंबा घाटातून जात होती, तर देवगड, कणकवलीस जाणारी वाहने कोल्हापूर, गगनबावडामार्गे करूळ घाटातून, तर कुडाळ, मालवण सावंतवाडी, गोव्यास व कर्नाटकात जाणारी वाहने आजरा, आंबोलीमार्गे जात होती. मात्र यंदा किणी (जि. कोल्हापूर) व तासवडे (जि. सातारा) टोल नाक्यांवरूनही सुमारे दहा हजारांहून अधिक वाहने मार्गस्थ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.