एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर आज तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने कामगारांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावर कामगारांनी आक्षेप घेतला आहे. कामगारांच्या वेतनात तफावत असल्याचा आक्षेप घेतला असून यासंदर्भात उद्या गुरुवारी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब आणि मान्यताप्राप्त संघटना यांच्यात बैठक होणार आहे.
राज्य सरकारने एसटी कामगारांसाठी ऐतिहासिक पगारवाढ केली आहे. एसटी कामगारांच्या एकूण पगारात ४१ टक्क्यांची वाढ होणार असल्याचं अॅड. अनिल परब यांनी सांगितलं होतं. दरम्यान, या निर्णयानंतर संप मिटेल असं वाटत होतं. मात्र, संप अद्याप मिटलेला नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काही एसटी कामगार ठाम आहेत. तर दुसरीकडे एसटी महामंडळाने वेतनवाढी दिलेल्या प्रस्तावावर मान्यताप्राप्त संघटनांनी तफावती बद्दल आक्षेप नोंदवला. या संघटनांनी परिवहन मंत्र्यांकडे बैठकीसाठी मागणी केली होती. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी आणि एसटीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याच मान्य केलं असून वेतन निश्चित मधील तफावती संदर्भात उद्या बैठक होणार आहे.
जे कर्मचारी १ वर्ष ते १० वर्ष कॅटेगिरीत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मूळ वेतन १२ हजार ८० होतं त्यांचं वेतन १७ हजार ८० रुपये झालं आहे. ज्यांच मूळ वेतन १७ हजार होतं. त्यांना २४ हजार पगार होणार आहे.
१० ते २० वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४ हजाराने वाढ केली आहे. ज्यांचा पगार १६ हजार होता. त्यांचा पगार २३ हजार ४० झाला आहे.
२० वर्षे त्याहून अधिक असणाऱ्या कामगारांना २ हजार ५०० ने वाढ देण्यात येणार आहे. ज्यांचं मूळ वेतन २६ हजार रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता ४१ हजार ४० झालं आहे.
ज्यांचं मूळ वेतन ३७ हजार होतं त्यांचं मुळ वेतन ५३ हजार २८० झालं आहे.
३९ हजार ५०० होतं त्यांचं वेतन आता ५६ हजार ८८० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.