कोरोना संकटात देशाची स्थिती चिंताजनक झाली आहे. केंद्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाल्यामुळे काँग्रेसवर खोटे आरोप केले जात असल्याचा खुलासा काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस टूलकिटच्या सहाय्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करत असल्याचा आरोप केला. या आरोपाला काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही असे म्हटले होते यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
टूलकिट प्रकरणावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. सदर टुलकिट हे बनावट आहे. राष्ट्रीय काँग्रेसतर्फे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा व संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. यामध्ये अतुल भातखळकर यांचेही नाव देऊ असे म्हटले आहे. तसेच मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे. असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.
भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. सदर टूलकिट हे बनावट आहे. @INCIndia तर्फे @JPNadda व
, @sambitswaraj वर गुन्हा दाखल केला जाणार आहे त्यात @BhatkhalkarA यांचे नाव ही देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे https://t.co/5LZhWbgH9N— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 18, 2021
अतुल भातखळकर काय म्हणाले
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टुलकिट सादर केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा कमी खतरनाक नाही.
‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पलटवार केला आहे.
संबित पात्रांचा पत्रकार परिषद घेऊन आरोप
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी एका टूलकिटचा उल्लेख केला आहे. या टूलकिटचा वापर करुन काँग्रेस भाजप आणि पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, काँग्रेस कोरोनाच्या इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणून उल्लेख करत आहे. तसेच कुंभमेळा कोरोनाचा सुपरस्प्रेडर असल्याचे सांगायचे आहे. यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांना प्रचार करण्यास सांगितलंय असा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे.
दरम्यान संबित पात्रा यांनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी रोज सकाळी ट्विट करतात तो टूलकिटचा भाग आहे. ज्या प्रकारे मोदी सरकारला बदनाम करण्यात येत आहे. यामध्ये जाणूनबुजून कुंभ मेळ्याचा उल्लेख केला जात आहे. परंतु बकरी ईदवर त्यांनी मौन धारण केले आहे. कोरोना संकटाशी सामना करत असताना काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसकडून भाजपवर आरोप करण्यात येत असून मोदी सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाल्याचे सांगण्यात येत आहे.