देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता Adv. निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निकिता यांना तीन आठवड्यांपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी शंतनू मुळूक यांना औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला. मुळूक यांना १० दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.
दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणी दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला अटक केली. त्यानंतर निकिता जेकब आणि शंतनु मुळूक यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने ११ फेब्रुवारीला निकिता जेकब यांच्या घरावर छापा मारला. छापेमारीत पोलिसांनी निकिता यांचा फोन आणि लॅपटॉप जप्त केला. त्यानंतर निकिता जेकब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
मुंबई उच्च न्यायालयात निकिता जेकब यांची बाजू वकील मिहिर देसाई यांनी मांडली. निकिता जेकब या गेल्या १७ वर्षांपासून वकील म्हणून सराव करत आहेत. यासह त्या पर्यावरणाबाबत अत्यंत जागरुक आहे. शिवाय, देशात सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा प्रभाव निकिता यांच्यावर पडला, अशी माहिती देसाई यांनी न्यायालयाला दिली. टूलकिट अनेक लोकांनी तयार केल्याचं समोर आलं आहे. या टूलकिटमध्ये हिंसेला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देण्यात आलेलं नाही. याशिवाय, लाल किल्ल्यावर हल्ला करण्याचंही त्यात म्हटलेलं नाही, अशी माहिती निकिताचे वकील देसाई यांनी सांगितली.