सध्या दिवाळीचा आनंदोत्सवाचा सुरू आहे. बाजारपेठांसह ग्राहकांमध्येही खरेदीचा मोठा जोर असल्याने एटीएमच्या बाहेर पैसे काढण्यासाठी रांगा लागत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम मधून जळालेल्या नोटा बाहेर आल्या आहेत. तर राजगुरुनगर येथील स्टेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएम मधून कागदाने चिकटवलेल्या आणि खराब नोटा बाहेर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून बँकांना सुट्टी आहे, त्यामुळे दिवाळीचे संपूर्ण व्यवहार हे एटीएमवर अवलंबून असल्याने एटीएमवर ताण पडत आहे. मात्र पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथील अॅक्सिस बँक आणि राजगुरुनगर येथील सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये विचित्र प्रकार घडला आहे. दोन्ही बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास दोन हजाराच्या जळलेल्या आणि कागदाने चिकटवलेल्या नोटा बाहेर येत होत्या. खराब नोटा बाहेर आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथील @AxisBank एटीएम मधून जळालेल्या नोटा बाहेर आल्या आहेत. तर राजगुरुनगर येथील @centralbank_in या बँकेच्या एटीएम मधून कागदाने चिकटवलेल्या आणि खराब नोटा बाहेर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. pic.twitter.com/sg5ZpsHYlc
— My Mahanagar (@mymahanagar) November 9, 2018
दरम्यान खातेदारांच्या बँक खात्यातून पैसे तर निघाले आहे. मात्र खराब नोटा व्यवहारात येण्यास अडचण येत आहे. दुकानदार अशा नोटा स्वीकारत नाहीत, त्यामुळे नागरिक धास्तावलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे परिसरात अॅक्सिस बँक आणि सेंट्रल बँक यांच्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत होता.
एटीएमला खाजगी ठेकेदारी
कॅशलेस व्यवहाराचे नारे संपूर्ण देशभर दिले जात असताना बँकांच्या एटीएमचा कारभार हा खाजगी ठेकेदारीवर अवलंबून असल्याने मनमानी पद्धतीने हा कारभार सुरु असतो. कधी एटीएममध्ये रोकड नसते तर कधी अशा फाटक्या, कागदाने चिकटवलेल्या तर कधी खराब नोटा एटीएम मधून बाहेर येतात.
एटीएम व्यवहारात बँकांचे हात वर
सध्या धावपळीच्या काळात एटीएमचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातून एटीएममधून फसवणूक होण्याच्याही घटना वाढत आहेत. तरीही एटीएम मधून काढलेल्या पैशामुले फसवणूक होत आहे. मात्र बँक हात वर करुन त्या ची जबाबदारी खाजगी ठेकेदाराची असल्याचे सांगत आहे. खातेदार हा बँकेचे नाव पाहून आपली पुंजी बँकेत जमा करत असतो तरिही बँक आपली जबाबदारी का झटकते? असा प्रश्न फसवणूक झालेले नागरिक विचारत आहेत.