आदिवासी समाज जंगल वाचवण्याचे काम करतो. जंगल वाचलं तर पाऊस येईल, पाऊस आला तर जमीन टिकेल. आदिवासी समाजामुळे पर्यावरण टिकून राहिले, अस स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यक्त केले. शरद पवार यांच्या उपस्थितीत जुन्नरमधील लेण्याद्री गडाच्या पायथ्याशी आदिवासी समाज प्रबोधन मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. आदिवासी समाज लाचार नसून स्वाभिमानी आहे. आज आदिवासी समाजाला नक्षलवादी म्हटलं जातं. कसं काय त्यांना नक्षलवादी म्हणता? आदिवासी समाजावर भूकबळीची वेळ येते आणि त्यांच्यावर अत्याचार होतात असही पवार म्हणाले.
आजच्या मेळाव्याला तुम्ही अन्नधान्य घेऊन आलात. तुमच्या भोजनाची सोय तुम्ही केली. यातून आदिवासी लाचार नसून स्वाभिमानी असल्याचे शरद पवार स्पष्टचं म्हणाले. याकार्यक्रमात शरद पवारांचे आदिवासी समाजाकडूनही स्वागत करण्यात आले. शरद पवारांच्या हातात धनुष्यबाण देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पवारांनी सुद्धा धनुष्यबाण उंचावून सन्मानाला दाद दिली.
जल, जंगल आणि जमीन हा जगातील महत्त्वाचा दुवा आहे. यात जंगल वाचवण्याचे काम आदिवासी समाजाने केले. आज आदिवासी समाजाला नक्षलवादी म्हटलं जातं. कसं काय तुम्ही नक्षलवादी म्हणता? आदिवासी समाजावर भूकबळीची वेळ येते आणि त्यांच्यावर अत्याचार होतात. अशा परिस्थितीत त्यांना आवाज उठवावा लागतो. त्यातून संघर्ष निर्माण होतो. हा तुम्हाला नक्षलवाद वाटत असेल तर तो तुम्हाला खुशाल वाटू द्या. ते त्यांच्या गरजांसाठी लढत असतात असेही पवार म्हणाले. 15 ऑक्टोबरला नागपूरात होणाऱ्या आदिवासी समाजाच्या आंदोलनात असेच मोठ्या संख्येने सहभागी व्हा. जगात एकोप्याचा मेसेज द्या अस आवाहनही शरद पवार यांनी केले.
आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. तुमचं दुखणं इथं मांडलात. आज महात्मा गांधींची जयंती आहे. इंग्रजांचे दीडशे वर्षाचं राज्य घालवण्याचं ऐतिहासिक काम त्यांनी केल्याचे शरद पवार म्हणाले. स्वातंत्र्याचा महामंत्र अख्ख्या जगाला महात्मा गांधींनी दिला. त्याबद्दल शरद पवारांनी अभिवादन केले. शिवजन्मभूमीत गांधी जयंती दिवशी हा मेळावा घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभाग व्यक्त केले. यावेळी शरद पवार म्हणाले की, काही लोक म्हणतात तुम्ही यांच्याशी जास्त संबंध ठेवता. तुम्हाला माहित आहे, हे नक्षलवादी आहेत. मी म्हणतो मला माहित आहे. पण हे कसले नक्षलवादी आहेत तर आम्ही कोणाला धक्का लावणार नाही, पण आम्हाला धक्का लावला तर आम्ही त्यास सडेतोड उत्तर देतो. असा हा नक्षलवाद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.