लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने तीन बाईकला धडक दिली. या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूर – बार्शी महामार्गावर ही घटना घडली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लातूरच्या या महामार्गावरल अपघाताची मालिका सुरुच आहे. आज देखील आणखी एका अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
लातूर – बार्शी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने तीन बाईकला धडक दिली. हा टॅक लातूरवरुन बार्शीकडे जात होता. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक तीन बाईकला जाऊन धडकला. या अपघातामध्ये बाईकवरील ६ जण चिरडले गेले. यामधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाता दरम्यान ट्रकने बाईकला धडक देत रस्त्याच्याकडेला असलेल्या शेतात जाऊन थांबला. या अपघातानंतर लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.
या भीषण अपघातामध्ये ५० वर्षीय नागनाथ मलबा येलगटे, २८ वर्षीय शंकर बाळू काळे, ३८ वर्षीय बुध्दघोष नामदेव पालखे, २८ वर्षीय प्रजीत पांडुरंग माळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर ६० वर्षीय जालिंदर गोपाळ घुट्टे आणि ५५ वर्षीय मीटाप्पा गोपाळ घुट्टे हे दोन सख्खे भाव जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.