नाशिक महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा वाद नवा राहिलेला नाही. कालच त्यांची आयुक्तपदावरून तडकाफडकी उलचबांगडी करण्यात आली. आज त्यांना मंत्रालयात नियोजन विभागात सहसचिव या पदावर नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपला पदभार सोपवून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी त्वरीत पदभार स्वीकारावा, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाचे उपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज काढले. मुंढे यांची आजवर ज्या ज्या ठिकाणी गेले तिथल्या स्थानिक लोकांमध्ये ते प्रचंड प्रसिद्ध झाले. त्यांच्या बदलीनंतर सामान्य लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. मात्र आता त्यांना साईड पोस्टिंग देऊन एकप्रकारे त्यांच्या प्रसिद्धिला चाप लावल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांचे नेहमीच विळ्या-भोपळ्याचे नाते राहिले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना भाजपच्याच लोकप्रतिनिधींनी त्यांच्याविरोधात रान उठवल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. याआधी जिथे जिथे तुकाराम मुंढे यांची बदली होत होती, तिथे तिथे स्थानिक नागरिकांमध्ये ते कमालीचे प्रसिद्ध होत होते. तर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मात्र ते नकोसे व्हायचे. म्हणूनच आता त्यांना तुलनेने कमी महत्त्वाचे आणि लोकांशी थेट संबंध न येणारे पद देण्यात आले की काय? अशी शंका घेण्यास जागा आहे.
महाराष्ट्रातील एकाही महापालिकेला नकोत आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे
मुळचे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याचे असलेले मुंढे हे कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. २००६ साली त्यांनी सोलापूरच्या महापालिका आयुक्तपदी पहिल्यांदा कार्यभार स्वीकारला त्यानंतर २०११ साली पुन्हा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून ते आले. या मधल्या काळात त्यांच्या सात ठिकाणी बदल्या झाल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्याबरोबरही त्यांचा वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर त्यांना मुंबईत विक्रीकर सहआयुक्त (२०१२),
नवी मुंबई मनपाचे आयुक्त (२०१६),
पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे (२०१७) आणि आता
नाशिक मनपा आयुक्त (२०१८) अशा विविध ठिकाणी पाठवण्यात आले होते. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांच्या हेकेखोर कार्यपद्धतीमुळे लोकप्रतिनिधींमध्ये त्यांच्याबद्दल खदखद निर्माण होत होती.