कोरोनाच्या संकटामुळे यंदा घरच्या घरीच विसर्जन करण्याचा किंवा कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, रत्नागिरीत समुद्रकिनारी विसर्जनासाठी गेलेल्या दोघे जण बुडाल्याची घटना ताजी असताना गुहागर तालुक्यातील बोऱ्या नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन जण बुडाल्याची घटना समोर आली आहे.
नेमके काय घडले?
गुहागर तालुक्यातील बोऱ्या नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे जण बुडाले आहेत. गुरुवारी गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी वैभव देवळे (३०) आणि अनिकेत हळे गेले होते. गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोन्ही तरुण बाहेर आले नाहीत. सुरुवातीला हे कोणाच्या लक्षात आले नाही. परंतु, बराचवेळ नदीपात्रातून बाहेर आलेच नाहीत. त्यामुळे शोधाशोध सुरु झाली. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर नातेवाईक आणि पोलिसांनी नदीपात्रात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधण्यात यश आले नव्हते. गुहागर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली असून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले असून सध्या या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
हेही वाचा – कल्याण-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू