धनत्रयोदशीला महाराष्ट्रात मुघलकालीन खजिना सापडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वटराणा येथे शोष खड्डा खोदताना दोन चांदीची नाणी सापडली आहेत. या नाण्यांवर फारसी भाषेत कलमा कोरल्या आहेत. ही नाणी मुघल बादशाह अकबर आणि औरंगजेबाच्या काळात वापरली जायची असे सांगितले जाते. 15 आणि 16 व्या शतकातील ही नाणी असल्याची माहिती आहे. गोंडपिपरी तालुक्यातील नितेश मेश्राम यांना शोष खड्डा खोदताना ही नाणी सापडली आहेत. ही नाणी त्यांनी जपून ठेवली आहेत. मात्र या नाण्यांमुळे चंद्रपूरच्या इतिहासात आणखी भर पडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंडराजांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आज चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळतात.यात आता गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा गावात सापडलेल्या नाण्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात अधिक भर पडली आहे.
ही नाणी चांदीची असून त्यांचे वजन 11 ग्रॅम आहे. फारसी भाषेत या नाण्यावर कलमा लिहिण्यात आल्या आहेत. मेश्राम यांनी ही नाणी जपून ठेवत इतिहास प्रेमी निलेश झाडे यांनी दाखवली. यानंतर झाडे यांनी इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला.
यावेळी ठाकूर यांनी फारसी भाषेत लिहिलेल्या कलमांचे वाचन केले, ही नाणी मुघल बादशाह अकबर आणि औरंगजेबाची असल्याचे सांगितले जात आहे. गोंडपिपरी हा तालुका त्याकाळी मुघलांच्या ताब्यात होता. वटराणा येथे त्या काळात मोठी वसाहत होती. या भागात संशोधन झाल्यास मुघल काळातील इतिसावर प्रकाश पडू शकतो, अशी शक्यता इतिहासकारांनी वर्तवली आहे.
गोलकार असलेली ही चांदीची नाणी औरंगजेबाचं आहे. या नाण्यावर फारसी भाषेत “सिक्का ज़द दर जहान चु बद्रे मुनिर. शाह औरंगजेब आलम गिर. हिजरी सन ११११” असं लिहिलं आहे. तर चौकोणी नाणं अकबराचं आहे आणि त्यावर अकबराचं नाव कोरलेलं आहे. हिजरी सन 993 लिहीले आहे.