मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. पुण्याच्या कात्रजमध्ये हा हल्ला करण्यात आला असून, उद्धव ठाकरेंच्या समर्थकांवर या हल्लाचा आरोप केला जात आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी हा आरोप केलाय. मात्र, हा हल्ला आमच्या शिवसैनिकांनी केला नसल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांनी म्हटले. मात्र हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे आमदार उदय सामंत यांनी म्हटले. तसेच, सभेला गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या हातात हत्यारे असल्याच आरोपही सामंत यांनी केला.
हेही वाचा – माझ्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
तसेच, त्यांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे. आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, असं सामंत म्हणाले. ते म्हणाले, असा भ्याड हल्ला करून कुणाला वाटत असेल की मी शिंदे साहेबांची साथ सोडेन, आमचे ४५ लोक शिंदे यांची साथ सोडतील, तर आज या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो आहोत. असे भ्याड हल्ले करून उदय सामंत थांबणारा नाही. कुठल्याही प्रसंगाला समोरा जाणारा आहे. कुणावर टीका करत नाही, त्याचा अर्थ मी हतबल नाही. आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशाराच सामंत यांनी हल्लेखोरांना दिला आहे.
“हा आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सातत्याने गाडी फोडण्याची भाषा केली जात होती. मात्र अखेर आज प्रत्यक्षात हल्ला करण्यात आला आहे. आम्हीही शांत बसणार नाही. आम्हाला भिडू नका, तुमच्याही गाड्या आहेत, आम्हीही फोडू शकतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे.