राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये दुकाने, हॉटेलही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. याबाबत साताऱ्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यापाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीनंतर उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत संवाद साधला यावेळी उदयनराजेंनी राज्यातील वाढत्या कोरोना परिस्थिती तसेच लसीचा तुटवडा याबाबत प्रतिक्रिया दिली. देशात प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आता लसीचा तुटवडा पडला नसता असे अजब वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे यांनी केले आहे.
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यापाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर म्हटले आहे की, कोरोना काळात लॉकडाऊनमुळे वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे. विकेंड लॉकडाऊनवर उदयनराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना वायरस हा शनिवार,रविवारीच बाहेर येतो का? लॉकडाऊमध्ये दुकाने बंद ठेवल्यास सर्व व्यापार ठप्प झाल्यास व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे, सणासुदीचे दिवस असल्यामुळे कर्ज काढून व्यापाऱ्यांनी माल भरला आहे. उद्या सगळ्या बँका हफ्ता भरण्यासाठी मागे लागणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली पाहिजे. मी व्यापारी असतो तर जग इकडचे तिकडे असले तरी दुकान सुरु ठेवले असते. तसेच व्यापाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी वयाची अट शिथिल करावी, व्यापाऱ्यांनी लस घेतली असली तरी त्यांना दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत नाही, मग कोण ऐकणार त्यामुळे कोरोनाचा व्हायरस शनिवार, रविवारलाच बाहेर येतो का असा प्रश्न भाजप खासदार उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे सर्व प्रश्न मांडले आहेत.
प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर
राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, प्रत्येकाने कोरोना लस घेतली पाहिजे. परंतु प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली असती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे. महाराष्ट्राला जास्त दिले आणि कुठल्या राज्याला कमी दिले जाते हा वाद निर्माण करु नका. महाराष्ट्राला जास्त कशाला मिळाले पाहिजे. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या क्षमतेप्रमाणे लस दिली पाहिजे. व्हायरल कोणत्या कालावधीत फिरतो, कोणत्या कालावधीत झोपलेला असतो. लशीच्या पुरवठ्याबाबत मी आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचेही खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.